ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.932
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९३२
गरूवार जाली अंबुला व्याली । व्येउनिया मेली माझ्या ठायीं ॥१॥ जेथें ठाव ना ठेवणी निघाली कोनी । तेथें सुईणी हात नाहीं ॥२॥ बापरखुमादेवीवरा विठ्ठलीं शेजबाज । सहज सहजाकार अंबुला देखा ॥३॥
अर्थ:-
माया ही स्त्री तिच्यामध्ये चैतन्याचा आभास झाला म्हणजे गर्भधारणा झाली. त्यामुळे चैतन्याला ईश्वरभाव आला. म्हणजे मायेपासून ईश्वराची उत्पत्ती झाली. याचा अर्थ माया ही ईश्वराला म्हणजे पतीला व्याली असे जरी झाले तरी ती माया परमात्मज्ञान झाल्यानंतर नाहीशी होऊन जाते. ज्या ठिकाणी वस्तुतः तिचा ठाव ठिकाणा नाही तेथूनच एका भागावर निघाल्यासारखी झाली. ती अनादि असल्यामुळे तिला किंवा तिच्यातील आभासरूपी ईश्वराला सुईणीचा हातही लागला नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याच्या ठिकाणी शेज बाज वगैरे काही नसून जो स्वतःसिद्ध असलेला परमात्मा तोच माझा पती आहे असे समजा.असे माऊली सांगतात.