ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.911
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९११
कासयाची चाड मज नाहीं वो साजणी । एकल्या निर्गुणी वेधियेलें वो माये ॥१॥ पवन वेगाचेनि अंतरलें तुम्हासी । आतां मागुती वो कैसी परतेन वो माये ॥२॥ ध्यान धारणा तनु मनु करणें । ठेवियेलें ठेवणे गोपाळचरणीं वो माये ॥३॥ ऐसें भुलवणीं भुलविलें नयनीं । रखुमादेविवर चिंतनी वो माये ॥४॥
अर्थ:-
एका निर्गुण परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी मनास वेध लागला म्हणजे मग प्रपंचातील कोणत्याही पदार्थाचे कौतुक उरत नाही. त्याचे वेधा ने मी कसे तात्काळ सोडून दिले म्हणशील तर सोसाट्याचा वारा ज्याप्रमाणे कोणतेही स्थान लवकर त्याग करतो. त्याप्रमाणे मी तुमचा सर्वांचा त्याग केला (वास्तविक प्रपंचाचा त्याग करावा लागतो असे नाही. कारण परमात्म्याचे ज्ञान झाल्यानंतर उत्तर क्षणीच संसाराचा आपोआपच त्याग होत असतो) अशा रितीने ज्याच्या संसाराचा त्याग सहज झाला आहे. तो पुन्हा संसाराकडे कशाला पाहील. त्या परमात्म ज्ञानाकरिता पूर्वी केलेले ध्यान धारणादि उपाय ज्या श्रीगोपालकृष्णाच्या चरणी लागून गेले होते. ते त्याच्याच चरणीं समर्पण केले. अशा प्रकारे त्या श्रीकृष्णाने आपल्या नजरेने मला भुलवून सोडले आहे. म्हणून रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याच्याच चिंतनात मी सतत राहात आहे.असे माऊली सांगतात.