ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.904
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९०४ .
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईये वो ॥१॥ वेधलें वो मन तयाचिया गुणी । क्षणभर न विसंबे विठ्ठलरूक्मिणी ॥२॥ पौर्णिमेचे चांदिणे क्षणक्षणां होय उणें । तैसें माझें जिणे एका विठ्ठलेंवीण ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलुचि पुरें । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥४॥
अर्थ:-
भुवैकुंठ जे पंढरपूर तेथे वास करणारा शामसुंदर लावण्याचा पुतळा जो श्रीविठ्ठल तो मी डोळ्यांनी पाहीला. रुक्मीणीचा वर जो श्रीविठ्ठल त्याच्या गुणाच्या ठिकाणी मनाचा वेध लागल्यामुळे त्याला क्षणभर सुद्धा विसरत नाही. पौर्णिमेचे चांदणे ज्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला कमी होऊन जाते. त्याप्रमाणे श्रीविठ्ठलावांचून माझ्या मनाची स्थिति होते म्हणजे मी प्रत्येक क्षणाला झुरणी लागते.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच एक मला पुरे. कारण माझे चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी लय पावते. असे माऊली सांगतात.