ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.796
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९६
आदि पुरुषां जय विश्वंभरिता नानापरी तुझा खेळू । जया ब्रह्मगोळु कल्पकोडी गडी मोडिता नलगे वेळु । वेदपुराणें मत्सरें भांडती बहुते करीत होती कोल्हाळु । होय नव्हे ऐसी भ्रांतीसी गुंतली तयासी तूं आकळू गा ॥१॥ तुझें नाम बरवें तुझें नाम बरवें । हरि वोळगों आपुल्या साच भावें ॥धु ॥ गायत्री पासाव वोळलें क्षीर करणी पासाव विस्तारु । दूध दहीं ताक नवनीत आगळें चहूंचा वेगळा पडिभरू । जो ज्या विषयें पढिये तोचि मानिती थोरु । सांठवण करितां एकवट नव्हे तैसा भक्ति आचारु ॥२॥ कवणा एका राया बहुत पैं सेवक त्यासी दिधला वेगळा व्यापारु । आपुलाले म्हणिये सुचित राहाटतां मान करील अपारु । समर्थाचा मोहो जाणोनी वेगळा करूं नये तयासी मत्सरु । साभिलाषपणें वर्णतां देखेल शिक लावील हा निर्धारु ॥३॥ कव्हणा एका राया बहुत पैं लेंकुरें आळविती नानापरी । एकें पाठीची एकें पोटीची एकें वडिलें एकें धाकटी सेखी सारिखाचि मोहो करी । द्वैतभेदु जया नव्हे संवादु सेखीं तयासी तो निर्धारी गा ॥४॥ सागरीचे तरंग आनेआन उमटती तेतुले अवतार होती । शिव केशव उंचनीच आगळे कासियानें मानावी भक्ति । परमात्मया सौरसें तेचि हे मानली विश्वमूर्ति । बापरखुमादेविवरा विठ्ठला परियेसी ज्ञानदेवो करिता हे विनंति गा ॥५॥
अर्थ:-
विश्वाचे पोषण करणाऱ्या हे आदिपुरुषा नारायणा तुझा या जगांत अनंत प्रकारचा खेळ आहे. या कल्पावधीपर्यंत राहाणाऱ्या ब्रह्मगोलासारखे कोट्यवधी ब्रह्मगोल(ब्रह्मांडे) उत्पन्न करण्यांस व त्याचा नाश करण्यास तुला मुळीच वेळ लागत नाही. तुमच्या स्वरुपांचा विचार करण्यांकरता सहा शास्त्रे, चार वेद, अठरा पुराणे यांनी एकमेकामध्ये भाडूंन कोल्हाळ करुन टाकला. त्यांत कांही जण परमात्मा आहे. म्हणतात तर काही जण परमात्मा नाही म्हणतात असे ते भ्रमात गुंतून पडले आहते. त्यांना तूं कसा आकलन होशील एवढ्याकरितां भोळ्या भाविकांनी या शास्त्रमतांच्या भानगडीत न पडता तुझ्या नामाचा उच्चार करावा. हेच चांगले. त्यांच्या त्या खऱ्या भोळ्याभावाने त्यांना हरि प्राप्त होईल.गायीपासून प्रथम दूध प्राप्त होते. व त्याच्यापुढे पुष्कळ विस्तारही होतो. प्रथम दूध, नंतर त्याचे दही, नंतर त्या दह्यापासून ताक, व ताकापासून लोणी. असा एकापेक्षा एक गुणामध्ये श्रेष्टपणा येत जातो. भोक्त्याला ज्याविषयी आवड असेल तो त्याविषयी त्याचा थोरपणा मानतो त्या दूधाच्या चार प्रकाराची एके ठिकाणी साठवण केली तर त्याचे पुन्हा दूध होत नाही. पण तसा प्रकार मात्र तुमच्या भक्तिचा नाही. कोणत्याही भावनेने जरी तुमची भक्ति केली तरी त्या भक्ति करणाऱ्याला तुमच्या स्वरुपाची प्राप्ती होते. राजाचे पुष्कळ सेवक असतात. व तो राजा आपल्या सेवकांना निरनिराळी कामगिरी देतो. ज्याला जी कामगिरी दिली असेल ती त्याने मनपूर्वक जर केली तर राजा त्याचा मोठा सन्मान करतो. याचाच अर्थ त्या सेवकांच्या कामगिरीमुळे राजा फार संतुष्ट होतो. सेवकाने आपापले काम मनपूर्वक करावे अशी राजाची उत्कट इच्छा असल्यामुळे सेवकाने आपआपली कामगिरी करण्यांत मुळीच आळस करु नये. जर मनांत अभिलाषा धरुन नेमून दिलेली कामगिरी करण्यांत सेवक चुकला तर त्याला राजा शासन करतो. दुसरा दृष्टांत असा आहे की एखांद्या राजाला पुष्कळ मुले आहेत ती मुले राजाच्या म्हणजे पित्याच्या मनोगताप्रमाणे वागून आपल्या पित्याला संतुष्ट करतात. त्या मुलामध्ये कांही ज्ञानी, कांही अज्ञानी, काही वडील, कांही धाकटी अशी जरी असली तरी राजा त्या सर्वावर सारखेच प्रेम करतो. कारण ती सर्व मुले आपलीच असल्यामुळे त्यांच्यांत भेदभाव करीत नाही. कारण त्यांच्या विषयी ऐक्यभावाचाच निर्धार असतो. समुद्रांवर जशा अनंत लाटा उमटतात त्याप्रमाणे तुमचे अनंत अवतार आहेत. त्या अवतारामध्ये शंकर लहान, विष्णु मोठा असा उंचनीचपणा न मानता भक्ति करावी. कारण ते सर्व अवतार तुमचेच आहेत. अशा त-हेचे तुमचे व्यापकत्व लक्षात घेऊन तुमची भक्ति करणे हीच खरी थोर भक्ति आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याचे वर्णन केल्याप्रमाणे माझ्या हातून भक्ति घडावी अशी माझी त्याला विनंती आहे. असे माऊली सांगतात.