ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.759
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९
बावनाचे संगती द्रुमभावे रातलें । सेखीं आपुलिया मुकलें जातीकुळा ॥१॥ लोहाचे सायास परिसेंसी फिटले । तैसें मज केलें गोवळ्यानें ॥२॥ मेघजळ वोळे मिळे सिंधूचिया जळा । तैसा नव्हे तो वेगळा एक होऊनि ठेला ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठली नुरेचि कांहीं । उत्तम मध्यम ठायीं व्यापूनि असे ॥४॥
अर्थ:-
उत्तम चंदनाला बावन्नीचंदन असे म्हणतात. त्या बावन्नीचंदनाच्या संगतीने इतर वृक्षही सुंगधीत होतात. त्याप्रमाणे एक गौळण म्हणते मी त्या श्रीकृष्णाच्या संगतीमुळे कृष्णमय झाले. त्याचा परिणाम असा झाला की मी आपल्या हीन जातिकुळाला मुकले व परमात्मरूप झाले. लोखंडाचे हीनत्वाचे सायास जसा परीस नाहीसा करतो. त्याप्रमाणे मला या श्रीकृष्ण परमात्म्याने जीवभावापासून काढून परमात्मरूप केले. हे माझे परमात्म्याशी ऐक्य होणे मेघाच्या पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये जसा सावयवत्वाने भेद असतो. तसा माझ्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये स्वगत म्हणजे अवयव भेद नसून आम्ही मूळचेच एकरूप आहोत. परमात्मा माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठलाचे ठिकाणी कोणत्या तऱ्हेचा भेद नसून उपाधि दृष्ट्या मात्र उत्तम, मध्यम भावाच्या ठिकाणी तो व्यापून आहे असे म्हणावे लागते असे माऊली सांगतात.