ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.740
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७४०
परे पडे मिठी तेथे बोलणेंचि नुठी । आवडी गिळूनियां आतां जीवें नाहीं तुटी ॥१॥ सांगिजे बोलिजे तैसें नव्हे गे माये । सुमरी मारिलें येणें श्रीगुरूरायें ॥२॥ निवृत्तिदासा सन्निधान दुरी । आवडी गिळुनी आतां जीवें नाहीं उरी ॥३॥
अर्थ:-
ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी परावाणीचे मौन होते. व वैखरीही चालत नाही. त्याच्या विषयी असलेले औपाधिक प्रेमही गेल्यामुळे आता आत्मरूपाने जीवाचा नाश नाही. ते परमात्मस्वरूप बोलून सांगण्यासारखे नाही. त्या आत्मस्वरूपाचे सुमरी’ म्हणजे स्मरणही त्या श्रीगुरूरायांनी नाहीसे केले. परमात्मा निवृत्तिरायांसी ऐक्य झाल्यामुळे त्याचा दास जो ज्ञानेश्वर त्याला श्रीगुरूनिवृत्तिरायांचे सन्निधानही दूर गेले. म्हणजे नाहीसे झाले. त्याच्याविषयी असणारी आवडही नाहीसी झाली. आणि जीवभावालाही थारा राहिला नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.