ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.705
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-६ वे, संतपर अभंग ७०५
साखरेचा ऊस जरी होय पुढती । मथितां घृतीं काय क्षीर निवडे ॥१॥ माघारे जीवन जरी वाहे सरिता । तरीच जन्मा येती हरीचे दास ॥२॥ विविधा मति भक्ति जे करिती । ते अंती नव्हती संसार बापा ॥३॥ कापुराचे मसीं जरी लिहिजे लिखित । तरी छाये पडे हात प्रकृतिचे ॥४॥ पवना पाठी पांगुळे लागती । तैं जन्मा येती हरीचे दास ॥५॥ संत वैष्णव हरिदासा जे नर निंदिती । ते वरपडे होती प्रेम किंकर ॥६॥ निवृत्तिदास म्हणे विव्हळी जे भजती । ते जन्मा न येती भाक माझी ॥७॥
अर्थ:-
साखरेपासून पुन्हां उस कधी निर्माण होईल काय? तूप घुसळून त्याच्यापासून लोणीपरत निघेल कां? नदीचा ओघ परत डोंगरातील उगमांकडे वळेल का? या गोष्टी जशा अशक्य आहेत.तसे हरिदासांना पुन्हा जन्मास येणे अशक्य आहे. विविध प्रकारची जे श्रीहरिचे भक्ति करतात ते पुन्हा संसारपाशांत अडकणार नाही.कापुराच्या शाईने कधी कुणास लिहीता येईल का? सूर्योदयाबरोबर आपल्या छायेवर आपला हात पडेल का? वाऱ्यांच्या पाठीमागे पांगळे धांवतील का? या गोष्टी जशा अशक्य तसेच हरिचे दास पुन्हा जन्मास येणे अशक्य.संत वैष्णव हरिचे दास जे संत, त्यांची निंदा करणारे ते वैषयीक लौकिक प्रेमाचे दास असतात. जे श्रीहरिला आर्ततेने भजतात ते पुन्हा जन्मास येत नाहीत. अशी माझी श्रीनिवृत्तीच्यादास माऊलींची शपथपूर्वक वाणी आहे.