ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.701
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ७०१
शृंगार करूनि हरिनाम । तांबूल गुरूअंजन लेऊन डोळां । भातारू होता तो निःशब्दीं । खिळिला परतोनी माघारी ठेलिये ॥१॥ काम निदसुरा कामिनी जागे । कांहीं के विपरीत गमे । भोग त्याच्या ठायीं निशब्दीं । खिळिला आपआपण्यातें रमे ॥२॥ पति पद्मिणीविणे गर्भ संभवला । सवेंचि प्रसूत जाली । तत्त्वबोध उपजला तेणें गुढी उभाविली ॥३॥ तया पुत्राचेंनि सुखें । सर्वहि विसरले देहभाव पडला विसरु । बापरखुमादेविवरू विठ्ठलीं । तेथें आणिकाचा नव्हे संचारू गे बाईये ॥४॥
अर्थ:-
शमदमादि जी ज्ञानप्राप्तीची साधने त्याचा मी शृंगार केला आहे. व हरिनामाचा तांबूल खाऊन गुरूमंत्राचे अंजन डोळ्यांत घातले आहे. याप्रमाणे थाट करून ती गोपी म्हणते, माझा भ्रतार जो परमात्मा तो शब्दातीत आहे. म्हणून त्याची प्राप्ती न होता ती माघारी फिरली. परंतु त्या कामीनीच्या ठिकाणी त्याच्या प्राप्तीची कामना कायमच होती. अशा वेळेला काय विपरीत प्रकार झाला पहा त्या निःशब्द परमात्म्याचा, ती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रमून भोग घेऊ लागली. पति पत्नी संबंधावाचून तिचे ठिकाणी गर्भ उत्पन्न होऊन ती प्रसूतही झाली व तत्त्वबोध उत्पन्न झाला. त्यामुळे तिने आनंदाची गुढी उभारली. त्या पुत्र उत्सवाच्या आनंदाने देहभावाचाही विसर पडून गेला. अशा प्रकारचा रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या ठिकाणी इतर कोठल्याही साधनांचा उपयोग नाही. असे माऊली सांगतात.