ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.630
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६३०
दृष्टीचें गुज सच्चिदानंद सहज । तें चक्षूच्या अंतरीं निज निरोपिलें वो माय ॥१॥ अनुवादु खुंटला एकपणे एकला । संबंधु तुटला मागिलाचा वो माय ॥२॥ पुरती दृष्टीपूर्ण ब्रह्मीच भासली । त्या सुखा दोंदुली वाढली वो माय ॥३॥ अवलोकिता न अवलोकवें बोलिजे तैसा नव्हे । हा रखुमादेविवरू भावें माल्हाथिला वो माय ॥४॥
अर्थ:-
ज्ञानाचे गुह्य जर काही असेल तर ते सच्चिदानंद रूप परमात्मा हेच आहे. तो परमात्मा चक्षुच्या आंत आहे. याचा अर्थ त्याच्या सहाय्याने डोळे रूपाला पाहतात. तो अद्वितीय असल्यामुळे शब्दाने त्याचे वर्णन करून सांगता येत नाही. कारण परमात्म व्यतिरिक्त जगत नावांचा दुसरा पदार्थच नाही. देहादि सृष्टीत द्वैत काय कमी आहे? मग अनुवाद करण्यात अडचण काय असे कोणी म्हणेल तर महाराज सांगतात. आता मागील अनात्मपदार्थाचा संबंध तुटला आहे. अंतःकरण वृत्तिच्या सहाय्याने तयार झालेले सच्चिदानंदात्मक ज्ञानही इतर अध्यस्त पदार्था प्रमाणे मिथ्याच आहे. म्हणून तेही ज्ञान निःशब्द परिपूर्ण ब्रह्मस्वरूपाचेच ठिकाणी असते.ती ज्ञानरूप वृत्ति भासली. त्या सुखाचे योगाने माझे दोंद वाढले आहे. म्हणजे मी अतिशय आनंदी आहे. त्या परमात्म्याला दृश्य करून पहाता येत नाही. व ते शब्दाने सांगता येण्यासारखे नाही. मी ब्रह्मज्ञान करून घेणारा, व ब्रह्मज्ञानाचे श्रवण करणारा हे द्वैतभाव रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, त्यानी नाहीसे करून टाकले.असे माऊली सांगतात.