ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.499
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४९९
कर्मत्याग करितां पावे अधोगति । भोगितां ही मुक्ति पाविजेना ॥१॥ सांडणे मांडणे दोन्हीही त्यागणे । प्राचिनी वर्तणें निर्विकल्पें ॥२॥ सुख दुःख भोग या दोन्ही भोगितां । न धरिजे अहंता सर्वथैव ॥३॥ देह जीव शीव सर्वांसही साक्षी । ज्ञानदेव लक्षी परब्रह्म ॥४॥
अर्थ:-
आपल्या विहीत कर्माचा त्याग केला तर अधोगती प्राप्त होते. फलाशा धरून जर विहीत कर्माचरण केले तर स्वर्गादिकांची प्राप्ती होते. पण त्यापासून मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून मी कर्म करीन किंवा कर्माचा त्याग करीन अशा दोन्ही तऱ्हेचा अभिमान टाकून प्रारब्धाने प्राप्त होणारे सुख दुःख भोग मुकाट्याने भोगावेत त्यांत अहंता मात्र मुळीच ठेऊ नये. कारणदेह जीव किंवा शीव या सर्वांचे साक्षीरूप जे ब्रह्म त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.