ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.496
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४९६
अज्ञाना स्वरूप निज विचारितां । संदेह तत्वता घालिताती ॥१॥ कैंचि गा विश्रांति दुर्जनाच्या संगी । दाटोनियां भोगी नरकदुःख ॥२॥ विषयाकारणे जाहले गुरू शिष्य । अनुभव अभ्यास स्वप्नीं नाहीं ॥३॥ शब्दची करूनी बोलताती ब्रह्म । अंतरीचें वर्म नेणतीच ॥४॥ तयाची संगती त्यजी ज्ञानेश्वर । जाहला निर्विकार संतसंगें ॥५॥
अर्थ:-
अज्ञानी गुरूला शिष्याने आपल्या आत्मस्वरूपाविषयी विचारले असता तो त्याला घोटाळ्यांतच घालतो. दुर्जनाच्या संगतीने सुख होणार कोठे? अशा संगत धरून शिष्य नरकादि अनेक दुःखे मात्र भोगतो. त्यांचा तो गुरूशिष्यपणा विषयोपभोगाकरिता असतो.त्यांच्या जवळ ब्रह्मचिंतनादि अभ्यास स्वप्नातही नसतो. केवळ शब्दाने ब्रह्माचा उच्चार करितात. पण तात्त्विक ब्रह्मज्ञानाचे वर्म माहित नसते.अशा भोंदूची संगती सोडून केवळ सत्संगतीने आम्ही निर्विकार बनलो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.