ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.468
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४६८
जे येथें होतें तें तेथें नाहीं । ठाईच्या ठाई हारपलें ॥१॥ घरींच्या घरी जाली चोरी । आपणावरी आळु आला ॥२॥ पंढरपुरी प्रसिद्ध जाणा । पुरविल्या खुणा ज्ञानदेवा ॥३॥
अर्थ:-
जे म्हणजे अहंकारादि जेथे होते म्हणजे आपल्या ठिकाणी प्रतीतीला येत होते ते अहंकारादि आपल्या स्वरूपाचा विचार केल्यामुळे तेथे नाही. विचाराने ते अहंकारादि आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच हारपून गेले. हे म्हणणे घरच्या घरी चोरी झाल्यासारखे झाले. असा आपल्या वरतीच आळ आला आळ म्हणण्याचे कारण वस्तुतः अहंकारादि अनात्मपदार्थ नाही व ते मूळचेच अध्यस्त असल्यामुळे विचाराने ते आत्मस्वरूपच झाले. व तो परमात्मा पंढरपूरात विटेवर उभा राहिलेला प्रसिद्ध आहे. या खुणा निवृत्तीनाथांनी मला सांगितल्या असे माऊली ज्ञानदेव म्हणतात.