ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.461
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४६१
जोडनियां जोडी जेणे हुंडारिली दूरी । भिकेची आवडी नावडे पंढरी ॥१॥ करंटे कपाळ ज्याचें नाम नये वाचे । सदैव सभाग्य तोचि हरिरंगी नाचे ॥२॥ आपण न करी यात्रा दुजियासी जावो नेदी । विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कवी ॥३॥ ऐसे जे जन्मोनी नर भोगिती अघोर । न करिती तीर्थ यात्रा तया नरकी बिढार ॥४॥ पुंडलिकें भक्तें तारिले विश्वजनां । वैकुंठींची मूर्ति आणिली पंढरपूर पाटणा ॥५॥ कायावाचा मानें जीवें सर्वस्वे उदार । बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारिकर ॥६॥
अर्थ:-
मनुष्य जन्माला येऊन भगवत्प्राप्तीची मुख्य जोडी जोडावयाची ती दूर हुदांडून देऊन संसाराची जोड जोडण्याची भिकेची आवड ज्याला आहे त्यास पंढरी आवडत नाही. करंटे कपाळ त्याचे की ज्याचे मुखावाटे नाम येत नाही. जे हरिच्या कीर्तनांत देहभाव विसरुन नाचतात. तेच खरे नित्य भाग्यवान म्हणून समजावे. तीर्थयात्रादि धर्मकृत्ये आपण तर करीत नाहीच पण दुसऱ्यालाही करु देत नाही असले विषयलंपट दुष्टबुद्धीचे पुरुष दुसऱ्याची दुष्टबुद्धी करून त्यास विपरित विद्येची शिकवण देतात.असे व्यवहार करणारे नर मनुष्य देहाला येऊन अघोर नरक भोगतात. त्यांना नरकवास मिळण्याचे कारण ते तीर्थ यात्रादि करीत नाहित. अशा जीवाची दया येऊन भक्तराज जो पुंडलीक त्याने वैकुंठाची मूर्ति पंढरपूर नगरांत आणून विश्वातील जनांचा उद्धार केला. काया वाचा मन ल जीव यावर सर्व प्रकारे उदार म्हणजे वमाझे पिता व रखमादेवीचे पती श्रीविठ्ठल ज्यांच्या करता सर्वस्व अर्पण करणारा असा जो तोच खरा विठ्ठलाचा वारकरी होय.