संत तुकाराम म. चरित्र ९
तुकाराम भाग-९
एकदा एका पाटलाने तुकोबांना घरच्यासाठी ऊसाचा भारा दिला. ऊस घरी आणतां आणतां रस्त्यात भेटणार्या मुलांना वाटत वाटत फक्त एक ऊस घरी घेऊन आलेत, ते पाहुन संतापाने जिजाईने तो ऊस त्यांच्या पाठीत जोराने मारल्याने ऊसाचे तीन तुकडे झाले अस नमुद आहे, पण ही अगदी असंभव गोष्ट वाटते. खेड्यात, जुन्या संस्कारांत वाढलेल्या, अतिशय धार्मिक वृत्तीची पतिनिष्ठ, पतीसाठी वाटेल तेवढे हाल अपेष्टा सहन करणार्या जिजाई कडुन अस घडण्याची कल्पनाही करु शकत नाही, अगदी अशक्य आहे.
खरी गोष्ट अशी होती की, तुकौबांनी राहिलेला एकच ऊस जिजाईच्या हाती दिल्यावर पुर्ण मोळीतुन एकच ऊस घरी आणला हे पाहुन एवढा तरी कशाला आणला म्हणुन सात्विक संतापाने ऊस जमीनीवर आपटला त्याचे तीन तुकडे झाल्याचे पाहुन तुकोबा म्हणाले “वाहवा ! तु बरोबर वाटणी केली ! तुकाराम महाराजांच्या अंतःकरणांत भक्ती आणि वैराग्याची कोवळी कोंब नुकतेच जन्मास येण्याची सुरुवात झाली होती, अशावेळी जिजाईने स्रीधर्मास अनुसरुन आपल्या देहाचे कांटेरी कुंपन करुन त्यांचे रक्षण करुन ते कोंब वाढीस लावले, इतकेच नाही तर त्या कोंबाचा मोठा वृक्ष बनवण्यासाठी अपार कष्ट केले, अशा या थोर माऊलीच्या एकंदर पतिनिष्ठेचे महत्व न ओळखणे म्हणजे तीच्यावर अन्यायच नाही का ?
महाराज आपल्या अभंगात म्हणतात “पतिव्रतेची देवाघरी सभा”। सर्वस्वाचा त्याग करुन निरहंकार वृत्तीने गिरिकंदात राहणे एकवेळ सोपे, पण पतिव्रताधर्म पाळणे महाकठीण व्रत आहे. तीने कायावाचा मनोभावे पतिसेवा केल्यामुळे तीला वाचासिध्दी प्राप्त झाली असावी हे पुढील ऊदाहरणावरुन लक्षात येईल. देहुपासुन कांही अंतरावर चिंचवड गांव आहे.
तुकोबांच्या काळी तेथे मोरया गोसावी( चिंतामणी देव) हे महान सिध्दीसामर्थ्य असलेले गणपती भक्त म्हणुन त्यांची प्रसिध्दी होती. त्याच काळी पुण्यात अनगडशहा मुसलमान इश्वरभक्त फकीर मोठे सिध्दीप्राप्त अवलिया होते. परीक्षा घेण्याच्या ऊद्देशाने ते चिंतामणींच्या वाड्यासमोर येऊन कटोराभर भिक्षा मागीतली असतां धान्याचे पेवेच्या पेवे त्या कटोर्यात ओतुनही कटोरा भरत नव्हता. चिंतामणींनी स्वतःच्या सिध्दीसामर्थ्याने कटोरा भरला पण तात्काळ रिकामा झाला हे पाहुन त्या अवलियाचे खरे सामर्थ्य ओळखुन वाड्यात बोलावुन त्यांचा सन्मान केला.
नंतर ते तुकाराम महाराजांचे साधुत्व व किर्ति अनगडशहाने ऐकल्याने त्यांचीही परीक्षा पहावी म्हणुन देहुला त्यांच्या घरी येऊन भिक्षेची आरोळी ठोकली. घरी आलेल्या कोणासही रिक्त हस्ते परत पाठवु नये हे जिजाबाईस महाराजांचे सांगणे ती तंतोतंत पाळीत असे, त्याप्रमाणे तीनं मुलगी गंगुला फकीराच्या कटोर्यांत पीठ वाढण्यास सांगीतले.
गंगुने आपल्या चिमुकल्या हाताच्या ओंजळीने कटोर्यांत पीठ टाकतांच कटोरा भरुन पीठ खाली सांडु लागले. आश्चर्यचकीत होऊन तुकोबाला शरण गेले, शेवटचे दिवस देहुत राहुन तीथेच देहाचे विसर्जन केले. कांही तपे, तपश्चर्या, योगसाधना करुनही चिंतामणी देवास फकीराचा कटोरा भरणे अशक्य झाले, त्यांचे ज्यांच्यापुढे सिध्दिसामर्थ्य लुळे पडले, तोच कटौरि जिजाईच्या नुसत्या शब्दाने भरला गेला, याचे मुख्य व महत्वाचे कारण तीने पाळलेल्या पतिधर्मात आहे.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
f