संत तुकाराम म. चरित्र १३
तुकाराम भाग-१३
तुकोबांच्या अश्या निस्पृह वृत्तीमुळे पती पत्नीत नेहमी वाद होत असे. रामेश्वर, मंबाजी वगैरे धर्ममार्तडांनी त्यांचा छळ केला, कारण तुकोबा निर्जिव गतानुगतिक नसुन जागृत वृत्तीचे जिवंत व तेजस्वी सुधारक होते. त्यांच्या उमेदिच्या दिवसांत दुष्ट चालींचा व नाना प्रकारच्या दांभिक आचारांचा तिव्र शब्दात निषेध करुन असल्या चालीरिती विरुध्द बंडाचा झेंडा उभारला.
त्यांचा देव फक्त विठोबा. अडाणी लोकात भूताखेतांच्या पुजेवर, शुद्र देवभावनेवर त्यांनी ताशेरे झाडलेत.वृक्षाचा कोमल अंकुर कठीण जमीनीतुन, पाण्याचा झरा जसा खडक फोडून बाहेर पडतो, त्याप्रमाणे तुकोबांसारख्या संताच्या ह्रदयात असणारा सद्विचार आणि सद्भावनांचा झरा खळखळ पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे बाहेर आल्याशिवाय राहु शकत नाही, ही एक निसर्गाची किंवा परमेश्वराची योजनाच असते. तुकोबांनी जे काही केले तेजनहित लक्षात घेऊन त्यांनी शुध्द मार्गाकडे वळावे म्हणुन! स्वतःची किर्ति किंवा मान सन्मानवाढवण्यासाठी नव्हे! बाह्य उपचारांचा त्यांना तिटकारा होता. दांभिकपणावर त्यांनी कोरडे ओढलेत.
त्यांच्या ठायी जीवाचें जीवपण व आत्म्याचे आत्मपण ही दोन्ही एकाच वेळी दिसुन येतात. जीव परमात्म्याचे ऐक्य होऊन त्यांना स्वानंदप्रतिती होऊ लागल्यावर चित्सागरावर खेळणार्या आत्मस्वरुपाच्या व जीव स्वरुपाच्या सर्व कृती त्यांच्या अभंगातुन व्यक्त होत होत्या.देवाबद्दल संत्कल्पना, त्यावर अखंड विश्वास अकृत्रीम व निरतिशय प्रेम, म्हणजेच धर्माचा पाया हीच निष्ठा ठेवुन यातील कर्मयोग, ज्ञानलालसा अवघा संसार या निष्ठेला जागुन पावन करावा हेच त्यांचे साधन होते.
ज्यांच्या साध्याभोळ्या पण भावनोत्कट भक्तीरसाने संपुर्ण महाराष्ट आपलासा केला, ज्यांनी आपल्या शिकवणीने भक्तीभावा विषयक तत्वज्ञानांत फार मोठी भर घातली. संतशिरोमणी तुकाराम महाराज स्वतः महान भगवद् भक्त होते. शरण आलेल्याची देव उपेक्षा करत नाही ह्यावर त्यांची पुर्ण श्रध्दा होती.
ते नेहमी आत्मपरिक्षण करुन दोषांचा परिहार व्हावा, मन शुध्द व पवित्र राहावे म्हणुन सतत जागृत असत. नामस्मरण करण्यास मन आधी शुध्द लागते. औषध घेऊन पथ्य पाळले नाही तर जसा औषधाचा गुण येत नाही तसेच स्वैर आचरण करुन नुसते देव देव केल्याने काहीच उपयोग होत नाही. मठ स्थापणे, शिष्यशाखेचा विस्तार करणे अशा उपाध्या त्यांनी कधीच मागे लावुन घेतल्या नाहीत.
मेघवृष्टीप्रमाणे उपदेश परमात्म्यावरच केला. ते पराकोटीचे निस्पृह होते. त्यांनी वाईट मार्ग सोडुन धर्माने चला, हरिनाम घ्या, हे लोकांजवळ मागीतले तर देवाजवळ प्रेम, भक्ती मागीतली. शिवाजी महाराजांनी पाठविलेले दिवट्या, छत्री, घोडे, मोहरांनी भरलेले ताट त्यांचे घरी अठराशे दारिद्र्य असुन सुध्दा त्यांनी परत पाठवले. इतकी निःस्पृहता जगांत तुकाराम महाराजांशिवाय कोणाजवळ असु शकते?
क्रमशः
संकलन -मिनाक्षी देशमुख