संत तुकाराम म. चरित्र १५
तुकाराम भाग-१५
तुकोबांच्या किर्तनाचा नाद एका भाविक भक्ताला लागला होता. घरात कितीही अडचण आली तरी तो किर्तन चुकवित नसे. एकदा त्याचा मुलगा खुप आजारी असल्यावर सुध्दा हा वेळ होताच किर्तनाला गेलाच. इकडे मुलगा आत्यंतिक होऊन प्राण सोडला. त्याची आई दुःखाने व संतापाने वेडीपिसी होऊन मुलाचे प्रेत उचलुन किर्तनस्थळी तुकारामांच्या समोर ठेवले, व अद्वातद्वा बोलु लागली. परंतु तुकोबा थोडेही विचलीत न होता श्रोत्यांना हरिनामाचा गजर करण्यास सांगुन स्वतः नामघोष सुरु ठेवला. हरिनामाचा गजर दाही दिश्यांनी दुमदुमले, आणि आश्चर्य म्हणजे ते मृत बालक जिवंत होऊन उठुन बसले.
डाॅक्टर व वैद्य शरीर सुस्थीतीत ठेवण्यासाठी जसे उपाय योजना करतात, तसेच मन आणि आत्मा ह्यांची वाईट अवस्थेतुन सुटका करुन अमृताचा लाभ देणे हेच संतजनांचे वैशिष्ट्य आहे. मेललं शरीर जिवंत करण्यांत विशेष अद्भुतपणा नसुन मेलेल्या आत्म्याला जिवंत करणे हे विशेष आहे.एकदा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महारांजांच्या समाधी दर्शनास गेले असतां, प्रदक्षिणा घालीत असतांना कांही पक्षी तीथे कणसातले दाणे खात होते, पण तुकोबांच्या चाहुलीने भिऊन उडुन गेले. पक्षांना आपल्यापासुन त्रास झाल्याचे पाहुन त्यांच्या हळव्या मनाला अतिशय यातना झाल्यात. आपली भक्ती अद्याप अपुरी आहे असे मनांत विचार आल्याने तिथेच बसुन नामस्मरण सुरु केले. नामस्मरण करतां करतां देहभान विसरुन त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागली, इतकी की, ते विदेहावस्थेत पोहोचले. पक्षी परत येऊन त्यांच्या अंगाखांद्यावर खेळु लागले. भानावर आल्यावर पक्षी अंगावर वावरत असलेले पाहुन त्यांना अतिशय आनंद झाला.
तुकोबाचा कोंडोंबा लोहकरे या शिष्याला काशीयात्रा करण्याची इच्छा झाली, म्हणुन द्रव्यासाठी तुकोबाला विनंती केल्यावर तुकोबांनी त्याला एक होन देऊन सांगीतले की, हा होन मोडुन यात्रेसाठी लागेल तो खर्च कर, परंतु त्यांतील एक पैसा राखुन ठेव म्हणजे शेवटपर्यत कमतरता येणार नाही.आणि यात्रा पुर्ण झाल्यावर माझा होन परत कर!कोंडोबाचा विश्वास न बसल्यामुळे प्रचिती पाहण्यासाठी त्याने होन मोडुन यात्रेसाठी आवश्यक सामान खरेदी केले व एक पैसा बांधुन ठेवला. दुसर्या दिवशी त्या पैशाचा होन झालेला पाहुन आश्चर्यमाश्रीत आनंद झाला व यात्रेला निघुन गेला.
यात्रेवरुन परत आल्यावर त्याला मोह सुटल्यामुळे तुकोबाला होन परत न करतां घरी लपवुन ठेवला व होन हरवला म्हणुन खोटेच सांगीतले. त्यावर तुकोबा स्तब्ध होऊन म्हणाले “तु होन गमावलास”. कोंडोबा घरी येऊन पाहतो तर ठेवलेल्या जागेवरचा होन नाहीसा झाला. मनात खजील होऊन स्वस्थ बसला.पैशाच्या लोभाने तुकारामासारख्या संतपुरुषाला फसवुन, सतत त्यांच्या सहवासांत राहुन होनाच्या लोभाने त्याने परमार्थाचा होन गमावला.ह्यावरुन एवढे निश्चीत की, शुद्र विचार बलवान असतात, ते नाहिसे करण्याकरितां निकराचा प्रयत्न आवश्यक आहे, केवळ सत्पुरुषाच्या सहवासाने कृतार्थ होते असे मुळीच नाही.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख