ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.971

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

अभंग ९७१

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९७१

पौर्णिमेच्या दिनी चंद्र अकळी जाहला । आमावास्ये ठेला पूर्ण कळी ॥१॥ देखिलें गे माय विचित्र विलक्षण । जाहलें स्वप्नभान जागृतीशी ॥२॥ मातेचिये पोटी पिता तो जन्मला । नवलाव जाहला काय सांगो ॥३॥ मश्यकें ओलांडीला स्वये मेरुगिरी । दहनाच्या पाठारी पीक जाहले ॥४॥ चंचूच्या सांडशे पक्षी घेते पाणी । सिंधुशी गिळुनी बैसिन्नला । बापरखुमादेविवर विठ्ठलची जाणे । परब्रह्म अनुभवणे परब्रह्म ॥५॥

अर्थ:-
ज्याप्रमाणे चंद्र हा प्रकाशमान आहे. त्याप्रमाणे जीव मूळचा स्वप्रकाशमान आहे. जशी अमावस्येची रात्र ही अंधकाररुप आहे. त्याप्रमाणे अंधकार म्हणजे आवरणात्मक अविद्यारुपी रात्रीमध्ये जीवरुपी चंद्रकलाहीन म्हणजे स्वस्वरुपज्ञानरहित होतो. परंतु पूर्वपुण्योदयाने सद्गुरु उपदेशजन्य बोधरुपी पौर्णिमेच्या दिवसी जीवरुपी चंद्र पूर्ण कलेने ज्ञानसंपन्न होतो. व त्यामुळे त्या ज्ञानी पुरुषाला ही जागृति स्वप्नसमान प्रतितीला येते. असे हे मोठे विलक्षण झालेले मी पाहिले. जीवांची आई जी माया तिच्या पोटी ब्रह्मच, जीवांचा बाप असलेला ईश्वर जन्मला. हा नवलावा काय सांगावा? चिलटाने मेरु पर्वत ओलांडावा किंवा अग्नी पठारांवर पीक यावे त्याप्रमाणे हे आश्चर्य घडलें याचा भाव असा आहे की अहंकार हा मेरु पर्वताप्रमाणे असून त्याला ओलांडले असे होय. चिंतारुपी अग्नीचे पठार म्हणजे अंतःकरण त्यांत बोधरुपी पीक येणे ही नवलाची गोष्ट आहे. चोचीने पाणी घेण्याचे ज्या पक्षाचे काम आहे अशा पक्षाने समुद्र गिळून टाकावा तद्वत सामर्थ्यरहित अशा जीवांनी अगाध असलेल्या परमात्म्यालाआपल्यी हृदयांत साठविले. तात्त्विकदृष्ट्या माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना जाणल्याखेरीज परब्रह्मस्वरुपचा अनुभव घेतल्यावांचून जीव ब्रह्मरुप होणार नाही. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *