ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.928
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके अंबुला अभंग ९२८
वऱ्हाड न होतां होतों खेळेमेळे । लग्न लागलें कवणे दृष्ट वेळे ॥ तेथुनी अंबोला चालवितो मातें । कैसेनी येथे निस्तरावें ॥१॥ मौनेंची घरवात करावियाची । चाड नाहीं मज या जिवाची गे माय ॥२॥ आया बायांनो ऐका वो न्यावो । येकांती सदा वसता हे नाहो ॥ अंगभोगा नाहीं ऐसा दुरावो । गरूवार होतसे हाची नवलावो ॥३॥ एखादे वेळे मजचि मारितोसी । लाजा मी सांगों कोणापासी । राग आलिया अवघेया ग्रासी । ऐसी अति प्रीति आम्हां दोघांसी ॥४॥ म्हातारा असला काय माय रूप नां वर्ण हात ना पाये । तरूणी आपुलें रूप ना साहे । क्षणभरी या वेगळी न राहे ॥५॥ पिसुणा देखतां बुझाविलें माये । बुझावणी माझी शब्द न साहे । बापरखुमादेविवरू विठ्ठलु पाहे । पहातें पहाणें जालें गे माय ॥६॥
अर्थ:-
अविद्यारूपी स्त्री म्हणजे वऱ्हाड न होता म्हणजे जगद् उत्पत्तीच्या पूर्वी आम्ही दोघे आनंदात होतो. पण माझे लग्न त्या परमात्म्याशी कोणत्या वेळेस लागले हे कांही कळत नाही. (परमात्म स्वरूपाचे ठिकाणी अविद्या केंव्हापासून आहे हे सांगता येत नाही. कारण परमात्मा जसा अनादि आहे. तसी अविद्या ही अनादि आहे.) ती अविद्या म्हणते माझे लग्न झाल्यापासून या परमात्मरूपी नवयाने माझ्याशी बोलणे सोडून दिले. म्हणून मी माझे आयुष्य कसे घालवावे. याने माझ्याशी जरी मौन धरले असले तरी मी याच्या सत्तेवरच घरातील सर्व कामे करावयाची त्यामुळे आतां मला हा जीवच नकोसा झाला आहे. शेजाऱ्या पाजाऱ्याच्या आया बायांनों हा न्याय तरी कसा आहे. पहा. हा माझा नवरा सतत एकांतात असतो. याचा व माझा अंग संग तर (विषम सत्ताक म्हणून) कधीच होत नाही. आणि चमत्कार असा की मी मात्र गरोदर राहिले. तो तियेशी शिवला नाही । वांझ गर्भिण झाली पाही’ हे प्रियत्तमा तूं एखादे वेळी मला मारतोसही मग मी आपली लाज कोणाजवळ सांगावी? तुला फारच राग आला तर तूं सर्वांचाच नाश करून टाकतोस अशा प्रकारची आम्हा उभयतांची प्रीति आहे. म्हातारा म्हणजे अनादि असलेला नवरा याला ना रूप, ना वर्ण, ना हात, ना पाय अशा प्रकारचा नवरा आणि मी तर आपुल्या तारूण्याच्या भरांत असून माझेच रूप मला सहन होत नाही. इतकी मी सुंदर आहे. पण इतके जरी आहे तरी मी मात्र याला सोडून क्षणभरसुद्धा वेगळी राहात नाही. मी अशी दुःखी कष्टी पाहून तो माझी समजूत काढतो. पण त्या समजावणीतील शब्द मात्र सहन होत नाही. असे हे माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल त्यांना पाहू गेले असता पाहणाराच पहाणे म्हणजे ज्ञानस्वरूप होतो. असे माऊली सांगतात.