ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.902
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९०२
सुख शेजारी असतां कळी जाली वो पहातां । देठु फेडुनी सेवतां अरळ केलें ॥१॥ अंगणी कमळणी जळधरू वोले वरी । वाफा सिंपल्यावरी वाळून जाये ॥२॥ मोतियाचे पाणी वाहे निळिये सारणी । सगुणाची लावणी लाउनी गेला ॥३॥ अंगणी वोळला मोत्यें वरूषला । धन्य दिवसु जाला सोनियाचा ॥४॥ चोरट्या मधुकरा कमळी घेतलासे थारा । मोतियांचा चारा राजहंसा ॥५॥ अंगणी बापया तूं परस रे चांपया । असुवी माचया भीनलया ॥६॥ वाट पाहे मी येकली मज मदन जाकळी । अवस्था धाकुली म्हणो नये ॥७॥ आतां येईल म्हूण गेला वेळु कां लाविला । सेला जो भिनला मुक्ताफळी ॥८॥ बावन चंदनु मर्दिला अंगी वो चर्चिला । कोणें सदैवें वरपडा जाला वो माये ॥९॥ बापरखुमादेवीवरु माझे मानसीचा होये । तया लागी सये मी जागी सुती ॥१०॥
अर्थ:-
श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन सुखाच्या बिछान्यावर आनंदाने देहतादात्म्य सोडून त्याचा भोग घेत असता, दोघामध्ये कलह होऊन ‘अरळ केले’ म्हणजे त्याने भलतेच केले. निघून गेला. शेवंतीचे फूल तोडून घेतले असता ती जशी दीन होते त्याप्रमाणे आतां माझी स्थिति झाली आहे. किंवा अंगणामध्ये कमळाची झाडे लावावीत त्याच्यावर पर्जन्य पडावा म्हणजे ती अत्यंत प्रफुल्लित होतात. इतक्यांत तिच्यावर जर कोणी कडक पाणी शिंपडले तर ती जशी वाळून जाते. त्याप्रमाणे माझी स्थिति झाली आहे. मोती उत्पन्न होण्याचे पाणी जसे स्वातीचे मेघ वाहातात. तशी माझ्याठिकाणी तो आपल्या गुणाची लावणी करून गेला. काय त्याचा आनंद सांगावा? तो नीलवर्णाचा मेघरूपी श्रीकृष्ण त्याने माझ्या अंगणा, जणू काय मोत्यांचाच वर्षाव केला. तो दिवस धन्य सोन्याचा झाला. म्हणून काय सांगू. अशा त्या आनंदाच्या भरांत हे चोरट्या मधुकरा श्रीकृष्णा मी कमळणी असून माझा तूं थारा घेतलास. त्यामुळे जसे राजहंसाला मोत्यांचा चारा घातला असतां त्यास आनंद होतो. तसा मला तुझ्यामुळे आनंद झाला. असे असता चाफेकळी सारखी जी मी त्या माझ्या अंतःकरणातून तूं एकदम निघून गेलास त्यामुळे माझी काय स्थिति आहे म्हणून सांगू माझ्या डोळ्यांत सारखे पाणी भरून येते. अंथरूणावर मी एकटी तुझी सारखी वाट पाहाते. त्या मदनाने मला फार आकळून टाकले आहे. आपल्या प्रियकरांच्या वियोगाने जी अवस्था होते ती काही सामान्य आहे असे म्हणू नये.आतां येतो म्हणून तूं गेलास मग इतका वेळ कां लावलास? अरे माझ्या डोळ्यांतील पाण्याने मोत्याने गुंफलेला शेला भिजून गेला. अत्युत्तम बावनी चंदन उगाळून माझ्या अंगाला थंडावा येण्याकरिता लावला पण त्याचा काही उपयोग नाही. कारण मला विरहदुःखांत ठेवून कोण्या भाग्यवान स्त्रीच्या हाती सापडलास कोणास ठाऊक. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सारखे माझ्या मनांत असावेत, त्यामुळे मी सारखी जागी आहे. असे माऊली सांगतात.