ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.797

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९७

यम नियम पाप पुण्य आम्हासी आपण भलतेंचि करिसी । तुझीया थोरपणा बिहुनी असावें कवणे शंकावें सयासी । प्रत्यक्ष जगीं बाटली नारी तिचे स्मरण लोकांसी । पुराणें डांगोरा पिटिताती हें पतिव्रतापण तयेसी ॥१॥ आवडे तें करिसी देवा कवण करी तुझा हेवा रे ॥धृ॥ बहुता परी उणे ऐकिजे पांडवा सांगो या गोष्टी । पांचापासुनी जन्मले पाचैंजण येक पत्नीच्या पोटीं । गोत्रवध करूनी राज्य करिती विश्वासी वंद्य शेवटीं । जन्मेजया ऐसें बोलिला सत्य तो पापिया जाला कुष्टी ॥२॥ प्राण जाईं तंव बोभाईला तुज पतन तया दशरथा । गणिका एक पाखिरू पोखिलें होतें पाचारिलें प्राण जातां । की तयेसी उर्ध्वगति ऐसी बोलती पुराणें कासया न मिळे पाहतां । बोलणे खुंटलें तुजपाशीं देवा वेव्हारू नाहीं सर्वथा ॥३॥ तपाचा जो राशी पुण्यपणें थोर । तीर्थरूप सर्वां तीर्थमंत्राचा अवतार । देव आणि शक्ति सूर्य तैसा विचारितां । तो मांडव्य ऋषि वाहिला सुळी एक ऊजाला वधिता । पुत्रा पाचारिलें पापिये दुर्जनें तो वैकुंठीं अजामेळु सरतारे रे ॥४॥ यज्ञमुखीं अवदानें देती त्या करिसी वांकडे तोंड । लोणी चोरावया जासी घरघरीं उघडिसी त्यांची कवाडें । छप्पन कोटि यादव संगती हे तुझे ते त्वां केलें शापावरपडे । कोळियाने तुज विधिलें पायीं त्यासी सायुज्यता कोडें रे ॥५॥ अष्टांगयोगें शरीर दंडिलें तुजलागी जाली पिसी । पुत्र दाराधन सांडुनियां जन हिंडताती वनवासी । ध्याती वाती पूजिती तूं ते त्यांसी निजपद सायासीं । विष पांजू आली पूतना राक्षसी सायुज्यता देणें तियेसी रया ॥६॥ वारया मोट बांधेल कोण आकाशा कुंप कायसा सूर्यापुढे दिवा लाऊनियां चालणें वाउगाची शीण जैसा । विचित्र तुझें रूप अव्हेरून जासी सर्वज्ञा । ज्ञानदेव म्हणे देवादि देवा जग भांबावलें ऐसिया भावा रया ॥७॥

अर्थ:-

हे,भगवंता, आमच्यामागे यम, नियम, पापपुण्य इत्यादि लावून देऊन तूं मात्र तुझ्या मनाला येईल तसे वाटेल ते करित आहेस. हे सर्व आम्हाला कळत असूनही तुझ्या मोठेपणाला भिऊन आम्ही गप्प बसतो.राजा वाटेल तसा वागू लागला तर त्याच्या वागण्याबद्दल शंका कोण घेणार? हे भगवंता तुम्ही मनाला येईल तशा काय काय गोष्टी केल्या आहेत त्या पहा आहिल्या प्रत्यक्ष बाटली असतां पतिव्रता म्हणून ‘अहिल्या द्रौपदी तारा’ असे तिचे लोकांनी स्मरण करावे. म्हणून पुराणांत नगारा वाजतो. हे तिचे पतिव्रतापण. आपण देव आहा, वाटेल तसे करता म्हणून तुमचा हेवा कोणी करावा. पांडवाच्या उण्यागोष्टी आम्ही शेकडो ऐकतो. असे पाहा की इंद्रादि पांच देवतांपासून एका पत्नीच्या(कुंतिच्या पोटीे) पाच पांडव जन्माला आले.त्यानी आपल्या सर्व गोत्रजांचा वध करून राज्य करू लागले. तरी ते सगळ्या विश्वाला वंद्यच झाले. अशा खऱ्या गोष्टी जनमेजय नुसत्या तोडाने बोलला तो पापी होऊन त्याचे अंगावर कुष्ठ फुटले. असा उलटा न्याय तुमच्या घरचा आहे. तसेच तुझ्या (रामाच्या) वियोगाने दशरथ तुझ्या नावाने प्राण जाईपर्यंत बोंबलला तरी तूं त्याला दर्शन दिले नाहीस आणि एका वेश्येने राघु पाळला होता व मरते समयी त्याला नुसते राघोबा म्हणून हाक मारली की तेवढ्याकरिता तिला तुम्ही उत्तम गति दिली असे पुराणे सांगतात. विचाराच्या दृष्टीने पाहिले तर या तुमच्या करण्याला कांही मेळ नाही. काय तुमच्याशी बोलावे तुमच्यापाशी काही व्यवहार म्हणून पदार्थच नाही. दुसरे असे पाहा सूर्यासारखा तपोराशी जो मांडव्यऋषि तो आपल्या पुण्याच्या योगाने सर्व जगाला पवित्र करणारा तीर्थरूप झाला. साक्षात् तो मंत्राचा अवतार, त्या मांडव्य ऋषिच्या पवित्रपणा पुढे साक्षात सूर्यादि देवसुद्धा आपल्या पवित्रपणाबद्दल साशंक होतात. असा पवित्र मांडव्यऋषि शौचास बसला असता त्याने एक ऊ मारली होती तेवढ्या अपराधाबद्दल त्याला तुम्ही सुळावर दिले. अजामेळ जन्माचा पापी त्याचा एक पुत्र नारायण म्हणून होता त्या मुलाला त्या पापी दुर्जनाने नारायण म्हणून हाका मारली तो आपलेच नामस्मरण केले असे समजून तुम्ही त्यास वैकुंठास पाठविलें हा काय न्याय. दुसरा चमत्कार असा की मोठ्या कष्टाने यज्ञ करून वैदिक मंत्राने तुला अवदाने देतात. ती पवित्र अवदाने तोंड वाकडे करून बघत देखील नाहीस याचे उलट त्या गवळ्याच्या घरी लोण्याच्या चोऱ्या करण्याकरिता त्यांची दारे उघडून घरोघरी शिरतोस हे काय योग्य आहे? अरे छप्पन्न कोटि यादव तुझ्यावर प्रेम ठेवणारे तुझ्या संगतीला होते. त्या सर्वांना तूं ब्राह्मणशापाने मारून टाकलेस हे तुझ्यावर भक्ति ठेवण्याचे त्या यादवाना फळ आहे काय? आणि ज्या कोळ्याने तुझ्या पायाला बाण मारून तुझा वेध केला त्याला मोठ्या आनंदाने सायुज्यता मुक्ति दिलीस हा कोणता न्याय. अष्टांग योगाच्या परिश्रमाने तुझ्या प्राप्तिकरिता ही योगी मंडळी वेडी झाली. तसेच पोरे बाळे व ऐश्वर्य सोडून तुझ्या प्राप्तिकरता काही लोक वनामध्ये फिरतात. कोणी लोक तुझे ध्यान करतात. वर्णन करतात, तुझे पूजन करितात त्यांना तुझी प्राप्ति मात्र मोठ्या सायासाने होते. व स्वतः तुलाच विष पाजण्याकरिता आलेली पूतना राक्षसीण तिला सायुज्यता मुक्ति देतोस याला काय म्हणावे? या तुझ्या वागणुकीचा मेळ घालणे म्हणजे वाऱ्याची मोट बांधण्यापैकी किंवा आकाशाला कुंपण करण्यापैकी किंवा सूर्यापुढे दिवटी धरून चालण्या सारखे फुकट श्रम करणे आहेत. हे सर्वेशा, नारायणा एकंदरीत तुझे स्वरूप विचित्र आहे. शेवटी त्याचाही तूं अव्हेर करून जातोस.हे देवा या तुझ्या मायिक लीलेला जग भांबावून गेले आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *