ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.783
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७८३
जन्माचे व्याज आपणचि गिळिलें । मुद्दलाचा ठावो नाहीं ऐसें केलें ॥१॥ ऋणाईत नव्हे हा निर्गुणासी समंधु । येणे परमबोधु बोधविला ॥२॥ ऐसी आपुली साक्षी कवणे पै द्यावी । निवृत्ति म्हणे कांहीं ठायीं न ठेवीची ॥३॥ बापरखुमादेविवरें केला घातासी घातु । आपला लक्षाचा लाभु वरी दिधला ॥४॥
अर्थ:-
पुन्हां जन्माला येण्याचे निमित्त जें पूर्विचे कर्म ते निवृत्तिरायांनी गिळून मुद्दलाचा ठाव ठिकाणा नाहीसा केला. या निर्गुणासी संबंध झाला असता जन्ममरणाचे ऋण राहात नाही. त्या निर्गुणाचा परमबोध श्रीगुरू निवृत्तिनाथानी मला ठसवून दिला. आतां ही साक्ष स्वतःच्या अंतःकरणाशिवाय कोणी द्यावी. श्रीगुरू निवृत्तिनाध म्हणतात. हे ज्ञानदेवा तूं आतां आपल्याठिकाणी काही एक पापपुण्य ठेवू नकोस. याप्रमाणे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी जीवाचा घात करणारा जो संसार त्याचाच घात करून टाकला. आणि आपले जे लक्ष्यार्थस्वरूप त्याचा लाभ करून दिला असे माऊली सांगतात.