ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.782
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७८२
दीनपण दवडूनि दीनानाथे मेळविलें । तें येणें गोपाळें केलें रूप नवल वो माये ॥१॥ पाहतां पारणी फिटलीं चक्षूंचीं । सर्व आवडीची कोथळी लाधली वो माये ॥२॥ आतां असो हे भरोवरी सांगणें या शरीरीं । उगवले अंतरी दृष्टीचिया वो माय ॥३॥ सहज अंगवणें निजगूज पाहणें । तें आनंदें निर्गुणें नयनीं प्रकाशले वो माय ॥४॥ डोळाची वाढिले परब्रह्म फळलें । त्या सुखाचें निमाले सांगणें वो माय ॥५॥ गुण गिहाईक जोडलाअमोल मोले घेतला । रखुमादेवीवर विठ्ठला वो माय ॥६॥
अर्थ:-
देहात्मबुद्धी हाच कोणी एक दीनपणा असून त्यामुळे अनेक प्रकारचे दुखे भोगावी लागतात. तो माझा दीनपणा फेडून दीनानाथ जो परमात्मा त्याच्या स्वरूपाशी या श्रीकृष्णानी ऐक्य करून दिले गे माय. श्रीकृष्णाचे दर्शन झाले. आणि डोळ्यांचे पारणे फिटून सर्व आवडीचा सर्व सुखाचा ठेवाच मला प्राप्त झाला. आता या शरीराचा संबंध असल्यामुळे अनेक खटपट होत असली तरी त्या सर्व व्यवहारांत आत्मज्ञानाच्या दृष्टीचा उदय झाला असल्यामुळे तो ज्ञानाचा निश्चय इतका अंगवळणी पडला आहे की सर्व व्यवहारांत निजात्म निर्गुण स्वरूपाचा आनंदच पहात राहावे, तो निजानंद माझ्या डोळ्यांत बसून राहिल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे परमात्मरूपच दिसते. ते सुख शब्दाने सांगता येणार नाही. अशी स्थिती फक्त या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाने झाली. तो श्रीकृष्ण परमात्मा आपल्या दर्शनाने गि-हाईक कोणी मिळते का असे पाहातच होता. एवढ्यांत त्याला माझी गाठ पडली. तेंव्हा मी माझ्याजवळची शमदमादि सर्व सामुग्री हेच कोणी द्रव्य ते मी त्यास देऊन त्या परमात्म्याला विकत घेतला. जे अमोल रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच होय असे माऊली सांगतात.