ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.779
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७७९
सदैवपण आलें गोपाळातें देखिलें । लक्षा एका जोडलें अमित्य गुणी वो माय ॥१॥ दैन्याचे सांकडीपासूनि वेगळावलें । पैं जवळी बैसविलें आनंदपदीं वो माय ॥२॥ जागृतिं शेवटी निद्राभुली नुठी । मायेसी म्यां मिठी दिधली वो माय ॥३॥ मागुती नको परतणी या शरीरी उरवणी । प्रपंचाची कहाणी निमाली वो माय ॥४॥ सदोदित भरलें त्या तिहीं गुणा वेगळें । तें अगणित वर्षलें प्रेमघरीं वो माय ॥५॥ सबराभरित भरला या देहभावा वेगळा । रखुमादेविवरू जवळी जोडला वो माय ॥६॥
अर्थ:-
भगवान श्रीकृष्णाचे नित्य असणारे ऐश्वर्य पाहून अगणित गुणसंपन्न परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी माझे लक्ष गढून गेले.आणि त्यामुळे मी संसारीकदुःखाचे संकटातून वेगळी झाल्यामुळे त्याने आपल्या सहजानंद पदावर बसवून घेतले. जागृति स्थूळदेहसंबंधी असून निद्रा ही त्याचेच आश्रयावर आहे. परमात्मस्वरूपज्ञानाने स्थूळदेहाचा निरास झाला. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणची जागृति केली. तशी निद्रा म्हणजे मायाही गेली. आणि सर्व प्रपंच्याला आत्मरूपानेच मिठी दिली व सर्व प्रपंच परमात्मरूप केला. आतां पुन्हा या शरीराच्या ठिकाणी आत्मत्वबुद्धीचा उदय होऊच नये अशा रितीने प्रपंचाची रडकथा संपली. त्रैलोक्यांत व्याप्त असून वस्तुतः त्रिगुणात्मक विश्वाहून निराळ्या असणाऱ्या परब्रह्माने माझ्यावर प्रेमधारीने अनंत सुखाचा वर्षाव केला.तो सर्वात भरला असून जो देहभावाहून वेगळा असणारे रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांना आत्मत्वाने प्राप्त करून घेतला असे असे माऊली सांगतात.