ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.753
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५३
मीतूंपण विकल्प मावळला मुळीं । दोहीमाजीं बळी कवण पाहों । पाहतां पाहणे द्रष्टत्व ग्रासिलें । स्वरूपचि उरलें कवणा पाहों ॥१॥ बोलो नये ऐसें केलें वो माय येणें । बोलतांचि गुणें आठऊ नाहीं ॥२॥ आठवितां विसरू संसार नाठवे । हे खूण स्वभावें बोलत्याचा । बोलतां बोलणें ठकचि पडलें मुळीं । स्थूळींचा स्थूळीं प्रकाश झाला गे माये ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु उघडा । निजबोधीं निवाडा ऐसा झाला । निवृत्तिरायें खूण लेऊनि अंजन । दाऊनि निधान प्रकट केलें ॥४॥
अर्थ:-
शुद्ध परमात्म्याच्या ठिकाणी तात्विक द्वैत नाही. परंतु मी किं तूं अशा द्वैताची प्रतिती येते. म्हणजे ती जीवाच्या विकल्पाने होते.परंतु परमात्मस्वरूपाच्या यथार्थ विचाराने तो विकल्प मावळून गेला असल्यामुळे, मी किंवा तूं यामध्ये कोण मोठा म्हणजे श्रेष्ठ आहे असे म्हणून कोणाला पाहावे. अद्वैत स्थितिमध्ये द्वैताचा अभाव असल्यामुळे द्रष्टा, दृश्य, दर्शन यांचा लोप होऊन केवळ परमात्म स्वरूप अवशेष असल्यामुळे कोणास पहावयाचे आहे. असे अद्वैत अवस्थान झाल्यामुळे बोलणेच शक्य नाही. कारण बोलणाऱ्या मुळी देहात्मभावच नाही कारण परमात्मस्वरूपाचा अविर्भाव झाला असता त्याला द्वैताचा विसर होतो. म्हणून संसार आठवत नाही. हे त्या अद्वैत स्थितिचे वर्म आहे. त्याचा अनुवाद करावयाचा तर द्वैत असावे लागते. पण अद्वैत बोधांत, बोलणाऱ्या, बोलणे हे द्वैतच मूळांत नष्ट होऊन जाते असा हा देहातले देहांतच अनुभव येतो. ही खूण निवृत्तिरायांनी डोळ्यांत अंजन घालून दाखविली म्हणजे स्वरूपनिधान प्रगट केले, या प्रमाणे आत्मस्वरूप माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याचे ठिकाणी स्वकीय आत्मबोधाने असा निवाडा झाला. असे माऊली सांगतात.