ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.691
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६९१
आम्ही संन्यास घेतला । देहादिकांचा त्याग केला ॥१॥ आम्ही संन्यासी संन्यासी । सदा राहो एकांतेसी ॥२॥ चित्तचतुष्टय निरसिलें । अज्ञाना तिळोदक दिधलें ॥३॥ ज्ञानचि विज्ञान आलें हातां । आम्हां नाही शरीरी ममता ॥४॥ ब्रह्माहमस्मि शुद्धज्ञान । तेथील सांडिला अभिमान ॥५॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु हृदयीं । तोचि सबाह्यअभ्यंतर ठाई असे रया ॥६॥
अर्थ:-
मला ब्रह्मसाक्षात्कार झाल्यामुळे देहादिकाचा त्याग करून आम्ही संन्यास घेतला. त्यामुळे आम्ही संन्यासी नित्य परमात्मस्वरूपात राहू. चित्त चतुष्टय म्हणजे मन, बुद्धि,चित्त,अहंकार याचे निरसन करून आत्मस्वरूपांच्या अज्ञानाला तिळोदक दिले. म्हणजे त्याचा नाश केला. ज्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश केला तें ज्ञानच परमात्मतत्त्व हाती आल्याने शरीराच्या ठिकाणी हे माझे शरीर आहे असा मम अभिमान राहिला नाही. त्याप्रमाणे ब्रह्माहमस्मि म्हणजे मी ब्रह्म आहे. या वृत्तिज्ञानाचाही अभिमान नष्ट झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, हृदयांत वास करणारा तोच अंतरबाह्य सर्व ठिकाणी आहे असे माऊली सांगतात.