ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 586
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५८६
आत्मतेजें तेज रवितेज बिंबे । जीव शिवीं बिंबे ज्ञानतेजें ॥१॥ तैसें तुज ज्ञान जालें रे हे काज । केशवीं विराज चित्त जोडेे ॥२॥ समाधीचे रुप रूपासी आलें काह्या । पसरूनी बाह्या देती क्षेम ॥३॥ प्रवृत्ति निवृत्ति दोहींची तटाक । उतरलासी एक सिंधोदकें ॥४॥ क्षीर नीर हरि जाला असे स्वादु । अवघाची गोविंदु नानादेहीं ॥५॥ निवृत्ति संपत्ति आलिया पैं हातां । तत्त्वी तत्त्व निमथा उलथा तूं ॥६॥
अर्थ:-
सूर्यामध्ये जे तेज दिसते ते आत्मतेजाचे प्रतिबिंब आहे. त्याचप्रमाणे जीवशिवामध्ये जे ज्ञान दिसते. तेही आत्मज्ञानाचेच प्रतिबिंब आहे. त्या आत्मतेजानेच केशव जो परमात्मा त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझी चित्तवृत्ति जडून विराजमान झाली आहे. मला असे वाटते की समाधीचे रूप बाह्या पसरून जणू काय तूझ्या स्वरूपाला भेट देण्याकरीताच आले आहे. प्रपंचाची प्रवृत्ति निवृत्ति ही दोन तटाके सोडून तूं एक परमात्मरूप सिंधुच बनला आहे. अशा स्थितीत क्षीरनीराचा स्वाद सर्व परमात्माच झाला आहे. आणि तो माझ्याच ठिकाणीच झाला आहे असे नाही.तर अनंत देहाच्या ठिकाणी तो सर्व गोविंदरूप परमात्माच आहे. अशी तुझी स्थिती झाल्यामुळे निवृत्ती मार्गातली जी विवेक वैराग्यादि ज्ञानसंपत्ती ती तुला आज लाभली आहे. त्यामुळे तुझ्या ठिकाणचा संसार उलथा म्हणजे परमार्थ होऊन गेला आहे. असे माऊली सांगतात