ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.488
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४८८
जगामांजी श्रेष्ठ सांप्रदायी नाना । कीर्ति ते भुवनामाजी फार ॥१॥ आम्ही एक दिन जाणा नाथपंथी । नीचाहूनी अथी अती नीच ॥२॥ सर्वांचे चरण वंदितसों सदा । श्रेष्ठपण कदा कीरे नसे ॥३॥ नेणोंची स्वरूप धर्माधर्म कांही । निवृत्तीच्या पायीं लीन जाहलों ॥४॥ नाठवेचि कांहीं अन्यथा साधन । ज्ञानेश्वर आन उरेचिना ॥५॥
अर्थ:-
जगामध्ये श्रेष्ठ सांप्रदायाचे अनेक पंथ असून त्या सांप्रदायांचा लौकिक फार मोठा आहे. आम्ही नाथपंथी लोक अगदी कनिष्ठा पेक्षाही कनिष्ट आमच्या ठिकाणी मोठेपणाचा अभिमान केंव्हाही आला नाही. म्हणुन सर्वाना नमस्कार करतो.पापपुण्याचे स्वरूप आम्हाला कळत नाही. मात्र मी निवृत्तीरायांना शरण गेलो. या साधनावांचून दुसरे काही साधन न करता मी वेगळेपणाने राहिलोच नाही. म्हणजे तद्रुप झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.