ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.485
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४८५
नाथिलें आभाळ जेवीं कां गगनीं । माया मुळींहुनी तैशी जाहली ॥१॥ ब्रह्मादिक काळ व्याली हे ढिसाळ । आथी रजस्वला इयेपरी ॥२॥ विवर्तक जाली विस्तारिलें जग । नव्हे भिन्न भाग एकमेव ॥३॥ मायोपाधी तेंचि जाहलें सगुण । येर तें निर्गुण जैसे तैसें ॥४॥ तेंचि निरुपण तोचि सर्वेश्वर । म्हणे ज्ञानेश्वर राजयोगी ॥५॥
अर्थ:-
आकाशांत दिसणारे ढग जसे आकाशातच नाहीसे होतात. त्याप्रमाणे ज्ञान झाल्यावर ब्रह्मावर भासणारी माया ब्रह्मरुपच होते.ब्रह्मदेवापासून मुंगी पर्यंत काळादि एवढे मोठे जगत सामान्य स्त्रीप्रमाणे ह्याच मायेपासून निर्माण झाले. वस्तुतः ब्रह्मावर विस्तारलेल्या जगताला ती विवर्तक मिथ्या भासवण्यात कारणीभूत झाली. ती ब्रह्माहून भिन्न ही नाही व ब्रह्माशी एकमेव अभिन्नहीं नाही तेच ब्रह्म मायोपाधीमुळे सगुण झाले. त्या उपाधीचा बाध झाला की ते पूर्ववत निर्गुण आहे, तो राजयोगी भगवान श्रीकृष्ण सगुणही आहे व निर्गुणही आहे, असे वर्णन वेदशास्त्राने केले आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.