ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.457
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४५७
नेणो ब्रह्ममार्ग चुकले । उघडे पंढरपुरा आले । भक्तें पुंडलिकें देखिलें । उभे केलें विटेवरी ॥१॥ तो हा विठोबा निधान । ज्याचे ब्रह्मादिकां ध्यान । पाऊले समान । विटेवरी शोभती ॥२॥ रूप पाहता तरी डोळंसु । सुंदर पाहतां गोपवेषु । महिमा वर्णिता महेशु । जेणे मस्तकीं वंदिला ॥३॥ भक्ति देखोनी लाचावला । जाऊं नेदी उभा केला । निवृत्तिदास म्हणे विठ्ठला । जन्मोजन्मी न विसंबे ॥४॥
अर्थ:-
माऊली म्हणतात आज चुकून ते परब्रह्म प्रत्यक्ष पंढरपूरास आले असे वाटते. ते परब्रह्माचे रूप पाहून त्याला पुंडलिकरायांनी विटेवर उभे राहाण्यास सांगितले.तो हा विठोबा सर्वसुखाचा ठेवा असून ज्याचे ध्यान ब्रह्मदेवादिक करत असतात. अशी ती समान पाऊले विटेवर शोभत आहे.त्याचे रूप जाणते डोळस पुरूष पाहतात. त्याचे रूप गोपवेष धारण केलेले आहे. ज्याचे माहात्म्य एवढे आहे की, भगवान शंकर ज्याला वंदन करतो. तो परमात्मा पुंडलिकाच्या भक्तिला लाचावल्यामुळे पंढरपुरास आला. पुंडलिकरायांनीही त्याला दुसरीकडे कोठे न जाऊ देता विटेवर उभा केला. हे श्रीविठ्ठला तुला मी जन्मोजन्मी विसरणार नाही. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.