ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.445
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१२ वे, गीतामहात्म्य अभंग ४४५
भगवद्गीता हेचि थोर । येणे चुके जन्म येरझार । वैकंठवासी निरंतर । भवसागर उतरेल ॥१॥ राम नाम सार धरी । तेचि तारक सृष्टीवरी । त्याचेनि संगे निरंतरी । भव सागर तरसील ॥२॥ व्यर्थ प्रपंच टवाळ । येणें साधिली काळ वेळ । नाम तुझें जन्ममूळ । हे केवळ परिसावें ॥३॥ विक्राळ साधिलें नाम । दूर होतील विघ्न कर्म । साधितील धर्म नेम । हें पुरूषोत्तम बोलियले ॥४॥ तंव अनुष्ठान सुगम । साधिले सर्व सिध्दी नेम । क्षेम असेल सर्व धर्म । सर्वकाळ फळले ॥५॥ ज्ञानदेव कर्म अकर्ता । पावन जाला श्रीअनंता । सुखदुःखाचा हरि भोक्ता । सर्वकाळ आम्हां आला ॥६॥
अर्थ:-
भगवदीता हे ‘आत्मा अवतरविते मंत्र’ असे असल्यामुळे तिचे महत्व मोठे आहे. त्या ज्ञानाने जीवाच्या मागे लागलेली जन्ममृत्यूची येरझार नाहीसी होऊन निरंतर वैकुंठवासी म्हणजे परमात्मस्वरूपाशी ऐक्य होऊन त्याच्या ठिकाणी संसाररूपी असलेल्या समुद्रातून तरून जातो. याचा अर्थ भगवदीतेच्या श्रवणाने जीवाला सकल दुःखनिवृत्ती व परमानंदप्राप्ती होते ही स्थिती प्राप्त होण्याकरिता प्रथम साधन कोणते असेल तर ते रामनामाचे स्मरण हे होय ते जर नित्य केले तर जीवांना संसार समुद्रातून सहज तरून जाता येईल. संसार हा व्यर्थ व असार आहे. तो तुझ्या नाशाला कारण आहे. परंतु नामस्मरण केलेस तर तो प्रपंच तुला काही एक करू शकणार नाही. ही गोष्ट चांगली लक्षात असू दे. उत्कंठेने नामस्मरण केले तर तुझी सर्व विघ्ने नाहीशी होतील. तसेच नामस्मरणाने तुझे नेम धर्म सिद्धिस जाईल असे भगवंताचे भगवद्गीतेत स्पष्ट वचन आहे. नामस्मरणाचे अनुष्ठान करण का सुलभ आहे. या नामस्मरणाने सर्व नियमधर्म सिद्धिस जातात. व यानेच सर्व धर्माचे
रक्षण होऊन ते धर्म सर्व काळ फळले. मी ब्रह्मरुप असल्यामुळे कर्म करूनही अकर्ता आहे. इतर अज्ञानी जीवाप्रमाणे या ठिकाणी अहंकार नसल्यामुळे मो अकर्ता आहे. अकर्ता असल्या मुळे सुखदुःखाचा भोक्ता मी नसून च एक हरिच आहे. असा माझा सर्वकाळ अनुभव आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.