ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.426
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२६
औट पिठावरी निरंतर देश । तेथ मी जगदीश असे बाई ॥१॥ त्रिकुटाचा फेरा टाकिला माघारां । अर्धमात्रेवरा वरी गेलों ॥२॥ अर्धनारी पुरूष एकरूप दिसे । तेंची ब्रह्म ऐसें जाण ॥३॥ ज्ञानदेवी शून्य नयनी देखिलें । सर्वत्रीं संचलें शून्य एक ॥४॥
अर्थ:-
योगी पुरूष ज्याला औटपीठ म्हणतात त्याच्याहि वर परमात्म्याचे स्थान आहे. त्रिगुणात्मक मायेचा निरास करून शुद्ध ब्रह्माची अर्धमात्रा ते माझे स्वरूप आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रकृति पुरूष हे अर्धनारीनटेश्वराच्या दृष्टांताप्रमाणे ब्रह्मरूपच आहेत असे समज. त्यालाच कोणी शून्य असे म्हणतात. तेच एक सर्वत्र व्यापक असलेले शून्य मी डोळ्यांनी पाहिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.