ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 528
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५२८
जळवायुवेगें हालत सविता । मुळी तो तत्त्वता स्थिर असे ॥१॥ माया अविद्याभास शीव तो बिंबला । जीवरुप ठेला होऊनियां ॥२॥ सुख दुःख भोगी जिवाचिये सत्ते । देहीं क्रिया वर्ते स्वाभाविक ॥३॥ अज्ञानें करुनी भुलणे जिवाशी । मुळीं शद्ध अंशी शीव चोख ॥४॥ जिवाशी उद्धार करावया कीर । म्हणे ज्ञानेश्वर जाणिजे कीं ॥५॥
अर्थ:-
वायुच्या वेगाने पाणी हलल्यामुळे त्यातील सूर्य प्रतिबिंब हलल्यासारखे वाटते. पण आकाशस्थ सूर्य स्थीरच असतो. त्याप्रमाणे माया व अविद्या यांत आत्मा प्रतिबिंबित होऊन मायेत शीव व अविद्येत तो जीव होतो. व जीवाच्या सत्तेतून नाना प्रकारची सुखदुःखे भोगीत असतो. देहाच्या स्वाभाविक क्रियेतून शीव शुद्ध असतो.अज्ञानाने जीव भ्रमिष्ट होतो. आणि शीव शुद्ध असतो.जीवाला आपला खरा उद्धार करुन घ्यावयाचा असेल तर जीवांनी जीवेश्वर स्वरुप जाणून घेतले पाहिजे असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.