संत तुकाराम म. चरित्र ४
तुकाराम भाग-४
तुकारामांचा जन्म इ.स. १५८८ मधे झाला. १६२७-ते ३० मधे महाराष्टात भयंकर दुष्काळ पडला. त्यावेळी ते ४२ वर्षाचे असावेत. त्यांचा विपरीत काळ येणे आणि त्यांची साधु व कवि होणे ह्या दरम्यान ज्या गोष्टी घडुन आल्यात त्या त्यांनी आत्मचरित्रपर अभंगात सांगीतल्यात. त्यांच्या कवितेचा निषेध होणे, वह्या बुडवणे या गोष्टींचा उल्लेख केला. दुष्काळ पडल्यानंतर व्यवहारात तुट पडत गेली.
दुष्काळाने घरांतील पुंजी संपल्यावर, दुकान नीट चालेनासे झाल्यावर व्यवहाराचा नीट जम बसत नाही असे पाहुन त्यांनी कोकणात जाऊन मीठ, मिरची, गुळाचा व्यवहार केला, परंतु त्यातही तुट येत गेली. नंतर कर्ज काढुन मीठ व गुळ खरेदी करुन बालाघाटास गेले. आलेल्या पैशातुन ञृणग्रस्त ब्राम्हणास सोडवले.
तुकोबांचे मन संसारात रमेनासे होऊन इश्वरभक्तीकडे अधिक लागले. ह्याच सुमारास त्यांना शेताची राखण करण्याचे काम मिळाले, पण राखण करीत असतां ते भजनांत इतके दंग, रंगुन जात की, तिकडे पक्षी दाणे लुटुन नेत. हे पाहुन शेतमालकाने पंचायतकडे फिर्याद केली. चौकशीअंती तुकोबाकडुन नुकसान भरपाई म्हणुन खत द्यायला लावले.
शेताची कापणी केल्यानंतर नेहमीपेक्षा अधिक धान्य आल्याने तुकोबाला देऊ केलेले धान्य त्यांनी नाकारले. यावरुन त्यांचा बाणेदारपणा दिसुन येतो. तुकोबांच्या पुर्वजांनी देहुला बांधलेले देऊळ मोडकळीस आले म्हणुन त्यांनी स्वतः कष्ट करुनही जीर्णोध्दराचे काम एकट्याने होऊ शकत नाही हे पाहुन त्या शेतकर्याने तुकोबाच्या वाटणीचे धान्य विकुन आलेल्या पैशातुन देऊळ तयार झाले. उद्यापन करुन ब्राम्हण भोजन घालण्यासाठी त्यांचे जवळ पैसे नव्हते, पण इश्वरी लीला अगाध आहे, त्या शेतमालकाला ऊपरती झाली आणि राखणीसाठी कबुल केलेले धान्य विकुन कार्य पार पाडले. देवळाचा जीर्णोध्दार झाल्याचा त्यांना अतिशय आनंद झाला.
तुकोबा आता परमार्थपर वाडःमयाचा जारीने अभ्यास करुन भजन, पुजन, किर्तन करीत होईल तेवढा परोपकारही करुं लागले. कोणाच्या कामात मदत कर, भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, गांजलेल्याचा परामर्श घे, व्याधीग्रस्तांना औषधपाणी, अशी नाना प्रकारची कामें करत शरीर कष्टवुन घेत. तुकोबांचा व्यापार उद्दीम अगदी बसला. संपन्न स्थितीत अब्रुत राहणारे ते अगदी तिरस्कृत अशा वेड्यापिश्याच्या स्थितीत पोहोचले. पत राहिली नाही, मानमान्यता नाहीशी झाली. त्यांची गाढवावरुन धींड सुध्दा काढण्यांत आली. ऐहिक स्थितीत असे परिवर्तन होत असतांना मात्र परमार्थात पुढे पाऊल पडत होते.
जगाविषयी व जगाच्या बेपर्वाईने उदासीनता अंगी बाणु न देता द्वेष, मत्सर, लोभ इत्यादी विकारांनी कलंकीत होणार्या प्रपंचात, परिभ्रमण करणार्या संसारात धृवाप्रमाणे अचल असणार्या निरंजन व विशुध्द अशा परमेश्वराकडे त्यांचे लक्ष स्थिरावत गेले. तुकोबाचे आईवडील परमधार्मिक असल्यामुळे ते आधीपासुनच भाविक, सदाचार संपन्न होते. संसार सांभाळुन धार्मिक ग्रंथाचे पठण, भजन पुजनांत वेळ घालवित असत. आईबाप निवर्तले, भावजयीचे मरण, भाऊ निघुन गेलेला, दिवाळे निघाले या सर्व वैतागाने संसाराचा वीट येऊन त्यांना एकांतवास अधिक प्रिय वाटु लागला. घरदार सोडुन रानावनात भजनांत दंग होऊन बसु लागले. अंतःकलह आणि अशांती जोरावली. आणि भगवंताच्या दर्शनाची तळमळ लागली.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख