ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 890
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९०
पेंडारा दाऊनियां थोकसी । देखिले पण केवीं जाये अंग लपविसी । तरी वेधा काय करिसी । मा शहाणपण तुझें नव्हे रे गोंवळा ॥१॥ आम्ही एकवीध जीवें तुंवा केले आधातुरें । वर्षावो वोसरलिया वोल्हासु जाय । तैसी न होत प्रेमळ उखरे गोंवळा ॥२॥ देठीं गुंफलिया फुलें डाळलिया आहाच तंव कांहीं न दिसे रे । परी घ्राण इंद्रियांच्या अंगसुखा समर्थ कोण असे रे गोंवळा ॥३॥ या बोला मानवोनी बापरखुमादेविवरें विठ्ठलें दिधलें आपआपणियातें । तैं पासुनी तें लपणेंची पारूषलें उभा पंढरिये येणे वेषं रे गोंवळा ॥४॥
अर्थ:-
पेंडाऱ्या म्हणजे लुटाणाऱ्या श्रीकृष्णा आम्हांला संसार दाखवून आपण मात्र त्यातच लपून राहिला आहेस. तशा जीवांना तुझी प्राप्ती नाही हे खरे पण आम्ही तुला ओळखला आहे.तूं कोठे जाशील? तूं आपले स्वरूप लपवून असतोस परंतु अंतःकरणांत तुझ्या स्वरूपाचा सारखा वेध असल्यामुळे आता तु काय करशील. आता तु लपण्याचा प्रयत्न करणे हे शहाणपणाचे काम नाही.आम्ही एकविध भावाने, जीव तुझ्या ठिकाणी ठेऊन संसार सोडुन तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी आम्ही ‘आधातुरे’ म्हणजे तुझ्या स्वरूपाशिवाय दुसरा आधारच नाही असे आहोत. तुझे ठिकाणी आमचे असलेले निर्मळ प्रेम रेताड जमीनीवर वर्षाव होऊन ओसरून गेल्यावर ओलावाही जसा निघून जातो. तसे आमचे नाही. झाडावर असलेली फूलं काढून त्याचा हार केला तर सुगंधाच्या दृष्टीने डोळ्याला त्याचे महत्व नाही. पण घ्राणेंद्रिय अंगाने सुगंध घेण्यास समर्थ आहेत. तसे आम्ही वरून दिसायला गबाळ असलो तरी निर्मळ भक्तिभावाने त्या फुलाच्या सुगंधावरचे आहोत. या आमच्या खेळण्यांत असलेला आमचा निर्मळ भाव माहित झाल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याने आपले आत्मस्वरूप आम्हाला दिले आणि तेव्हा पासून निर्गुणरूपांने लपण्याचे सोडून देऊन भक्तांकरिता पंढरीस कटेवर हात ठेऊन तोच श्रीकृष्ण परमात्मा उभा आहे.असे माऊली सांगतात.