ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.985
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९८५
ऐसा गे माये कैसा योगी । जे ठाईं जन्मला तो ठाव भोगी ॥१॥ माय कुमारी बाप ब्रह्मचारी । एकवीस पुत्र तयेचे उदरीं ॥२॥ आचार सांडुनी जालासे भ्रष्ट । माउशिसी येणे लाविलासे पाट ॥३॥ पितियाचा वेष धरूनियां वेगीं । मातेचे सुख भोगावया लागीं ॥४॥ आणि मी सांगों नवल काई । येणे बहिणी भोगिली एकेचि ठायीं ॥५॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी जाणे । अनुभवावांचूनि कोण्हीच नेणें ॥६॥
अर्थ:-
कसा हा सर्वेश्वर? महान योगी ईश्वर आहे. ज्या मायेपासून याचा जन्म झाला त्याच मायेचा हा उपभोग घेत आहे. यांत मौज अशी आहे की ईश्वराची आई जी माया ती स्वतः कुमारी आहे आणि बाप जो परमात्मा म्हणजे (ब्रह्म) ब्रह्मचारी आहे. असे जरी असले तरी अनिर्वचनीय सबंधाने त्या मायेच्या उदरी एकवीस स्वर्ग हेच कोणी एकवीस पुत्र जन्माला आले. आपल्या मातोश्रीचा उपभोग घेणारा हा कसा भ्रष्ट झाला. यांने आपल्या मावशीसी म्हणजे मायेची बहिण जी अविद्या तिच्याशी ‘रूपं रूपं प्रतिरूपं बभूव याप्रमाणे प्रत्येकात जीवरूपाने होऊन अविद्येशी तादात्म्यापन झाला. मातेच्या म्हणजे अविद्याजन्य विषयसुखाचा भोग घेण्याकरिता आपला पिता जो बाप त्याचा द्वेष केला. म्हणजे त्याला ओळखले नाही. याचे काय नवल सांगावे? ज्या आवरण शक्तीने जीव झाला. त्याच अविद्येची विक्षेपशक्तिरूपी बहीण तिचाही भोग घेतला. माझे हे बोलणे यथार्थ ब्रह्मानुभवी पुरूषालाच कळेल इतरांना ते कळणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.