ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.940
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी अभंग ९४०
रात्री दिवस वाहातसे चिंता । केशव धडौता होईन मी ॥१॥ खिरजट घोंगडे फाटकें तें कैसें । वेंचिलें तैसें भोगिजेगा ॥२॥ वित्त नाहीं गांठी जीवित्वा आटी । उघडी पाठी हींव वाजे ॥३॥ घोंगडे देईल तो एक दाता । रखुमादेविवरा मागों रे आतां ॥४॥
अर्थ:-
रात्रंदिवस मनांत चिंता वाहतों की सर्वत्र परिपूर्ण जो परमात्मा केशव तोच मी होईन. तसा झालो म्हणजे खिरजट म्हणजे घाणेरडे देहात्मभावाचे फाटके घोंगडे ते कसे राहणार ? त्याचा नाश (बाध) झाला असता त्या केशवरूप धड घोंगड्याचा मी भोग घेईन. उत्तम घोंगडे घेण्यास साधन संपत्ती च नसली तर जीवाला फार कष्ट भोगावे लागतात. कारण चांगले घोंगडे नसल्यामुळे उघडा देहात्मभाव असतो त्यामुळे कष्टरूपी थंडी फार वाजते. याकरता बाह्यप्रवृत्ति टाकून मन मागे फिरले तर ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल मोठे दाता असल्यामुळे ऐक्यभावाचे घोंगडे देईल. असे माऊली सांगतात.