ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.905

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९०५

सुखाचिये गोठी सुख आलें भेटी । तया लाभासाठी जीव वेचिलागे माय ॥ तंव अवचितें सगुणरूप भरलेसें नयनीं । बोलतां अंगणीं म्यां वो देखियेलें ॥१॥ जीवाचा जीऊ माझा भेटवा यादवराजा । उचलल्या चारी भुजा देईल क्षेम ॥२॥ न करा उपचार न रंगे हे मन । दृष्टिपुढें ध्यान ठसावलें । आवडी गिळूनि येणें सुख विहरोनि ठेलें । चित्त माझें गोविलें गोवळेनीं ॥३॥ आतां भरोवरी उरवितां नुरे उरी । आनंदे अंतरीं कान्हो संचरला ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठल निर्गुण । तो सुखाची सांठवण गिळूनि ठेला ॥४॥

अर्थ:-

परमात्मस्वरूपाच्या आनंदाच्या गोष्टी बोलत असता साक्षात् तें सुखच भेटीला आले. तसा प्रत्यक्ष लाभ व्हावा म्हणून मी आपला जीव खर्ची घातला. एकदा अशा स्थितीत एकाएकी ते सगुणरूप माझ्या डोळ्यांत भरून गेले. आणि अंगणांत माझ्याशी तो बोलत आहे. असे मी पाहिले. माझ्या जीवाचा जीव तो यादवांचा राणा मला भेटवा.तो आपल्या चारी बाह्या उचलून मजला क्षेम देईल. असे करवा. त्याच्या विरहामुळे माझ्या शरीराच्या ठिकाणी जो ताप होत आहे. तो ताप निवृत्त होण्यांकरिता दुसरा काही उपचार करू नका. त्याने माझे मन शांत होणार नाही. माझ्या दृष्टिपुढे सारखे त्याचे ध्यान ठसावले आहे. त्या गोधने राखणाऱ्या श्रीकृष्णाने प्रत्यक्ष भेटीच्या प्रेमाचा प्रसंग नाहीसा करून माझे चित्त विरहांत गोवून ठेवले आहे.आतां खटपटी न करता मनांत इच्छा आहे की आनंदाने माझ्या अंतःकरणांत श्रीकृष्णाने संचार केला आहे. त्याची भेट झाल्याशिवाय दुसऱ्या उपायांचा काही एक उपयोग नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे निर्गुण श्रीविठ्ठल त्यांनी माझी सुखाची साठवण तेच गिळून टाकली.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *