ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.901
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ९०१
देऊनियां भेटी मजसी न करी गोठी । लांचावला जीउ पाठी न राहे वो ॥ निष्ठुर म्हणो तरी अपंगीतो मातें । व्यापुनी जीवातें उरी उरवितो ॥१॥ तो दाखवावो माये धरीन त्याचे पाये । तयालागीं जीऊ आहे उतावेळु ॥२॥ भेटीचेनी सुखें मनची होय मुकें । तें रूप देखें परी बोलवेना ॥ सगुण गुणाचा म्हणोनी घातली मिठी । तंव तो आपणिया समसाठी करूनी ठेलें ॥३॥ काय नेणों कामाण कैसें वो जालें । चित्त चोरूनी नेलें गोवळेनें । बापरखुमादेविवर विठ्ठलें अंग लपवुनी । चैतन्य चोरूनी नेले गें माये ॥४॥
अर्थ:-
भगवान परमात्म्याने मला भेट दिली परंतु माझ्याशाची तो बोलत नाही. त्याविषयी माझा जीव इतका लाचांवला की तो जीवस्वरूपाने निराळा उरतच नाही.आता त्याल निष्ठुर म्हणावे तर माझा स्विकार करुन मला अंतरबाह्य व्यापून टाकून जीव असा उरूच देत नाही. असा जो परमात्मा तो मला दाखवा गे बायांनो. त्याचे केंव्हा पाय धरीन अशारितीने माझा जीव त्याच्या दर्शनाकरिता अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या भेटीच्या सुखाची कल्पना मनांत आली म्हणजे मन अगदी मोकळे होऊन जाते. काय सांगू? ते रूप पाहिले तरी त्याचे वर्णन करता येत नाही. श्रीकृष्ण परमात्मा हा उत्तमगुणाचे निधान आहे. म्हणून त्याचे पायी मिठी घातली. तर तो जीवाला आपल्या प्रमाणे परमात्मरूपच करून ठेवतो. कशी मला त्याच्या दर्शनाची इच्छा झाली कोण जाणे? त्या गोधने वळणाऱ्या श्रीकृष्णाने माझे चित्त चोरून नेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी आपले स्वरूप लपवून माझे जीवचैतन्य चोरून नेले.असे माऊली सांगतात.