ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.712
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७१२
श्रवणें कीर्तने जाले ते पावन । सनकादिक जाण परमभक्त ॥१॥ जाली ते विश्रांती याचकां सकळां । जीवीं जीवनकळा श्रीमूर्तिरया ॥२॥ पादसेवनें अक्रूर जाला ब्रह्मरूप । प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे ॥३॥ सख्यपणे अर्जुन नरनारायण । सष्टी जनार्दन एक रूप ॥४॥ दास्यत्व निकट हनुमंते पैं केलें । म्हणोनी देखिले रामचरण ॥५॥ बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद । बिभिषणा वरद चंद्रार्क ॥६॥ व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक । आणि पुंडलीक शिरोमणी ॥७॥ शुकादिक योगी रंगले श्रीरंगी । परिक्षितीच्या अंगी ठसावलें ॥८॥ उद्धव यादव आणि ते गोपाळ । गोपिकांचा मेळ ब्रह्मरूप ॥९॥ अनंत भक्त राशी तरले वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदी ॥१०॥
अर्थ:-
या अभंगामध्ये नवविधा भक्ति करून कोण कोणते भक्त उद्धरून गेले ते ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत श्रवण, कीर्तन करून सनकादिक परम भक्त पवित्र झाले.जीवांचे जीवन असणारा जो पंढरीराय त्यांनी या याचक भक्तांना समाधान दिले.पादसेवन भक्ती करून अक्रूर नावांचा भक्त परब्रह्मरूप झाला.सख्य भक्तीने नर जो अर्जुन तो नारायणस्वरूप झाला याचा अर्थ सर्वसृष्टि हे ज्याचे स्वरूप आहे. असा जो जनार्दन त्याचे स्वरूपांत मिळाला.हनुमंताने एकनिष्टपणाने दास्यत्व भक्ति केल्यामुळे त्याला रामचरण प्राप्त झाले. तसेच बळी, भीष्म, प्रल्हाद, नारद, बिभीषण, व्यास वसिष्ठ वाल्मीक, चंद्र सूर्यासमान असणारे भक्त त्याच प्रमाणे भक्त शिरोमणी पुंडलिक, तसेच शुकादिक योगी हे सर्व भक्त श्रीरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भक्तिमध्ये रंगुन गेले. त्याचप्रमाणे उद्धव, यादव, गोपाळ आणि गोपी इत्यादि भक्तही भगवत्स्वरूप होऊन गेले.तसेच असंख्य भगवत्भक्त वानरही सच्चिदानंदरूप परमात्म्याच्या नामाने उद्धरून गेले. ते सच्चिदानंदस्वरूपच माझे घर आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.