ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.635
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६३५
आपला गुणग्राम सांडोनियां गेलिये । निवांत राहिलिये निर्गुणीं वो माय ॥१॥ परोपरी पाहतां सर्वरूपी गोपाळ । तो मजपाशीं परी वेळ न लगतां वो माय ॥२॥ अनुवाद खुंटला सर्वांगे भेटला । गुणग्राम तुटला सहज वो माय ॥३॥ ऐसे म्यां रूप आपुलें आपणचि केलें । रखुमादेविवरें विठ्ठले वो माय ॥४॥
अर्थ:-
गुणमयी मायेचे कार्य जे शरीर, ते सोडून निर्गुण परमात्म स्वरूपाचे ठिकाणी मी स्वरूप होऊन राहिले आहे. जगतात अनंत आकार दिसले तरी त्या सर्व ठिकाणी श्रीकृष्ण भगवान आहे. असे दि़ले वेळ न लागताच तो मलाहि प्राप्त होतो. त्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा यथार्थ अविर्भाव झाल्यामुळे आता अनुवाद करण्यास तरी शिल्लक कोण राहिले आहे कारण, गुणग्राम म्हणजे गुण समुदाय निवृत्त होऊन गेला. मी त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप झालो. हे होण्याला रखुमादेवीचे पती जो श्रीविठ्ठल त्याचीच कृपा आहे असे माऊली सांगतात.