ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.607
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०७
मन सुमन घालूनि माळा । करुनि सकळां गळां वो माये ॥१॥ आउट पिठींची दुरुगुळी घातली । तेथे दोघे पुंजे बैसविली वो माये ॥२॥ तेथें अद्वैत रुप परोपरी वासु । करोनिया सायासु वैराग्यज्ञानें वो मायें ॥३॥ ऐसा हृदयमंदिरी दुर्गादेवी अंतरीं । रखुमादेविवरु निर्धारी वो माये ॥४॥
अर्थ:-
चांगले मन हेच कोणी फुले त्या फुलांची गळ्यांत पुरेल अशी सुंदर माळ करुन घातली म्हणजे सर्व प्रकाराने मन स्वाधीन करुन ठेवले. नंतर साडेतिन मात्रेच्या ॐ काराचे अधिष्ठान जे परमात्मस्वरुप त्याला जेव्हां नमस्कार केला त्यावेळी दुर्गुळी म्हणजे धूरी घातली तेव्हा बोध व भक्ति जवळ होती. जण ती दोघे परमात्म्याची पूजाच करीत होती. तेथे अनेक प्रकारचे सुवास ज्यांत आहेत. असा अद्वैताचा अंगारा लावला. पण ही वैराग्याची व ज्ञान प्राप्तीची स्थिती प्राप्त करावयास फार सायास करावे लागले. मी अंतर्मुख दृष्टि करुन जेव्हां पाहू लागतो. तेव्हा माझ्या हृदयांत रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हीच कोणी दुर्गादेवी माझ्या हृदयांत प्रगट झाली आहे. असे मला दिसते. असे माऊली सांगतात.