ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.487
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४८७
जें जें पाहुं जाय सुमनें करूनी । अदृश्य होऊनी तेंचि लपे ॥१॥ दुजेचि न दिसे काय आतां करूं । कवणा विचारूं सुखगोष्टी ॥२॥ आपणाआपण विचारिजे आथी । जाहली विश्रांति मीपणाशीं ॥३॥ बाहेर भीतरी एकमेंव दिसे । अन्यथा हें नसे गुरूसाक्षी ॥४॥ ज्ञानेश्वर हे गिळुनीयां नाम । ब्रह्मचि स्वयमेव सांठविलें ॥५॥
अर्थ:-
आत्मज्ञान झाल्यानंतर चांगल्या मनाने ज्या ज्या दृश्य वस्तुकडे पाहू गेले असता ती सर्व दृश्य वस्तु ब्रह्मरूप आहे असा निश्चय होऊन जातो. आतां जगतात परमात्म्यावाचून दुसरा पदार्थच मला दिसेनासा झाला. आता मी सुखाच्या गोष्टी कुणाला विचारू.त्याचा विचार आत्म्यासीच करावा असे म्हंटले तर मीपणाची हरिस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांति झाली. म्हणजे मी म्हणून विचार करणारा त्या हरिहून वेगळा नाहीच सदगरूच्या कृपेने सर्व पदार्थाच्या ठिकाणचे नामरूप नाहीसे होऊन आंत बाहेर दिसते.४ आंत, बाहेर,जिकडे, तिकडे पाहावे तिकडे मला साक्षी ब्रह्मरूपच ठसवलेले दिसते. नामरूप संपवून मला जिकडे तिकडे ब्रह्मच भरलेले दिसते असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.