ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.472

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१४ वे, कर्मविधी निषेध अभंग ४७२

पथ:कारे कर्म आचरितां । विधि जिज्ञासी काय सत्ता । अष्टादश पुराणें नानामतें आचरतां । परी तयांसी विधि विवेक न कळे तत्त्वता । कर्म कळा जयाची वाचा उच्चारितां । ऐशी नाना द्वंव्दें उपाधि कें जल्पती परी । एकही नेणे तेथींची वार्ता रया ॥१॥ ऐशी भ्रांती साम्य बोलती सकळे । परी न कळे पूर्ण सत्ता रया ॥२॥ निजब्रह्म बुद्धि नेणसी । गव्हारा वाउगा का शिणसी । यासाठी भ्रमूनियां बरळशी । पहिले नव्हे तुज संकल्पे । करिशी नाना गोष्टी रया ॥३॥ आतां अथातो धर्म जिज्ञासा । ब्रह्म जिज्ञासिक वचन । हे तंव वेदींचे प्रमाण । तरी वेदे जें वदविते न कळे । वेदकळा लय लक्ष धारण । पूजा समाधीचेनि यज्ञ यागादिकें कर्में । जपतप अनुष्ठान नाना । उपासना मत्रयंत्रादि साधनें । धांडोळितां परी तें एकही न घडे । ब्रह्म जिज्ञासिक वचन । येणे सुखासाठी बापा होशी पैं हिंपुटी । स्वानंद जीवन सुख आहे आन रया ॥४॥ नाना अर्थवाद उपाधि शब्दज्ञानें तेणें । केवीं शुद्ध होती यांची मनें । नाना मुद्रा संकल्पाचिया वाढवितां । तेणें केवीं पाविजे ब्रह्मज्ञानें । मी ब्रह्म ऐसे शब्द वाखाणूं जाशी तरी तेणें । ब्रह्म ऐसें कवी होणें । ब्रह्माहमस्मि बोध वा उच्चारितां । हेही अहंकाराचें लेणें । आतां परतें सकळही वाव जाणोनियां । कांहीं आपलें स्वहित करणे । बापरखुमादेविवर विठ्ठल चिंतितां । निजसुखासी येऊ नेदी उणें ॥५॥

अर्थ:-

विधिनिषेध जाणुन निरनिराळ्या तऱ्हेचे कर्म का आचरण करता. १८ पुराणे निरनिराळ्या शास्त्रकारांची मते यांनी सांगितल्याप्रमाणे वागत असता तुम्हाला विधि निषेध खरोखर कळतच नाहीत, ज्याचे कर्म कौशल्य वाणीने उच्चारित असतात व ज्याच्या ठिकाणी उपाधिने अनेक प्रकारे द्वैतभान झाल्याची बडबड करतात. पण त्या ब्रह्मस्वरूपाची वार्ताही त्यांना ठाऊक नसते. ही भ्रांती आहे. साम्यतेने सर्वजण बोलतात. पण त्या ब्रह्माची पूर्ण सत्ता त्यांना कळत नाही.मी ब्रह्मच आहे, ही गोष्ट तुला कळत नाही, मग वेड्या विनाकारण कर्माचा शीण कशाला करतोस. म्हणून सांगतो तुझ्या मूळ स्वरूपाला कोणतेही कर्म करण्याची आवश्यकता नाही. भ्रमाने बरळून तूं आपल्या इच्छेनेच नाना कमें करितोस.आत “अथातो धर्मजिज्ञासा” व “अथातो ब्रह्मजिज्ञासा” ही वचने वेदाला प्रमाण आहेत.तरी पण वेदांत लय,लक्षण, धारण, पूजा, समाधि, यज्ञ, याग, जप, तप, उपासना मंत्र, तंत्र वगैरे सुखाकरिता अनेक साधनें धांडोळिली तरी त्यातील एकही ब्रह्म जाणावे अशी सांगणारी नव्हेत ज्या सुखाकरता तूं कष्टी होतोस ते सुख याहून भिन्न आहे. कर्माची स्तुती करणारी अर्थवाद वाक्ये अनेक आहेत.त्या वाक्यांच्या योगाने जीवांची मने शुद्ध कशी होतील? निरनिराळ्या शब्दांच्या संकल्पांनी अगर खुणांनी ते ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होईल? मी ब्रह्म आहे. असे नुसते बोलण्याने तू ब्रह्म कसा होशील? मी ब्रह्म आहे असे वाचेने उच्चारणे ही गोष्ट देखील अहंकाराची ठरेल. आता या गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणून सोडून दे जर तुला सुखाची इच्छा असल तर तूं माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगांचे चिंतन करीत जा. म्हणजे ते तुझ्या सुखांत कमीपणा येऊ देणार नाही. असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *