ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 590
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५९०
आधीच तूं ज्ञान वरी जालें उन्मन । हरि हें जीवन हृदयी आलें ॥१॥ स्थिरावलें ध्यान ज्ञानाचिये वृत्ति । विज्ञान संपत्ति साधलिया ॥२॥ अंधकारपट नासला समतेज । रामरूपी पैज दीपज्ञान ॥३॥ संतशांत शांति उलथीचा ठसा । कृष्णरूपी दिशा तेजोतेज ॥४॥ अलक्ष लक्षिते अगोचर पर । तेथेही गव्हर संचले असे ॥५॥ ज्ञानदेव सुखी जालीसे विश्रांति । परमानंद चित्ती निरंतर ॥६॥
अर्थ:-
निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानोबा तूं मूळचा ज्ञानरूप असून तुझ्या मनाची स्थिती उन्मन होऊन गेली आहे. कारण सर्व जीवांचे जीवन जो श्रीहरी तो तुझ्या हृदयांत प्रगट आहे.ही ज्ञानसंपत्ती प्राप्त झाल्यामुळे ज्ञान ध्यानाच्या वृत्ति आपोआपच स्थिर झाल्या. रामकृष्णरूपी परमात्म्याचे ठिकाणी ज्ञानदीप प्रदीप्त झाल्यामुळे प्रपंचरूप अंधकाराचा सर्व पट नष्ट झाला.त्याचप्रमाणे शांत्यादिकाची स्थिती झाली.कारण कृष्णरूपाचे तेजाने सर्वदिशा प्रकाशित झाल्या.वस्तुतः अगोचर अलक्ष असे जे परमात्मतत्त्व त्याचठिकाणी हे रामकृष्ण रूपही गुप्तरूपाने राहिले आहे. मला परमानंद प्राप्त झाल्यामुळे माझ्या चित्ताला विश्रांती मिळाली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.