ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.942
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके घोंगडी अभंग ९४२
चौऱ्याशी लक्ष हिंडतां हाट । पुंजे दाट सापडले ॥१॥
हित ये खेपेंसी बरवें जालें । सुरंग घोंगडे हाताशीं आलें ॥२॥
येणें पाडें न माये कोठें । घोंगडें मोठें सांपडलें ॥३॥
मनोरथ पुरले रे आतां । बापरखुमादेविवरा विठ्ठलाशी ध्यातां ॥४॥
अर्थ:-
चौऱ्यांशी लक्षयोनी हाच कोणी एक बाजार त्यांत फिरता फिरता म्हणजे जन्म घेता घेता मोठ्या पुण्याईने मला हा मनुष्यदेह प्राप्त झाला. या मनुष्यदेहाच्या खेपेला आलो हे फार चांगले झाले. कारण मनुष्यदेहातच च परमात्मैक्य बोधरूपी सुंदर घोंगडे हाती आले. हे परमात्मरूपी घोंगडे इतके मोठे आहे की ते कोठे मावतच नाही. असे मोठे घोंगडे सांपडले. असा मनुष्यरुपी शरिराला आल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे ध्यान करता आले व त्यामुळे माझे मनोरथ परिपूर्ण झाले. असे माऊली सांगतात.