ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.784
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७८४
दुरूनी येक ऋण मागावया आलें । माझें मी पाहिले तंव कांहीं नाहीं ॥१॥ भीतरील माझी पंचरत्ने नेलीं । स्वस्वरूप वाहवली मध्य गिळियेलें ॥२॥ निवृत्तिबोधे मी बोधलें । सांगते वाहवले सर्वस्वेसी ॥३॥ ऐसा रखुमादेविवरू विठ्ठलु आपण पुढारला । माझा निर्वाळा केला संसारीचा ॥४॥
अर्थ:-
अनेक जन्मामध्ये केलेली पुण्याई हेच कोणी ऋण परमात्म्याशी मागण्याकरिता आले आणि मी कोण आहे हे माझे मी पाहू लागले. तो माझा मीपणाच नाहीसा झाला.माझ्या तील पंचरत्ने म्हणजे पंचप्राण स्वस्वरूपा बोधामध्ये वाहून गेले म्हणून त्या परमात्म्याने मलाच गिळून टाकले. श्रीगुरुनिवृत्तिरायांच्या बोधाने मला हा बोध झाला. त्या मुळे मांझे देहात्मभाव सर्वस्वी वाहून गेले. असे मी आपला अनुभव सांगतो. हा सर्व व्यवहार रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी पुढाकार घेऊन केला आणि संसारापासून वेगळेपणाचा माझे ठिकाणी निश्चय केला असे माऊली सांगतात.