ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.739
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७३९
ब्रह्मीं ब्रह्म होणें हें तो कठीण सांगतां । आब्रह्मीता जयाचिया सत्ता विस्तारले ॥१॥ सांगतां नये सांगावें तें काय । तेथील हे सोय गुरुखुणा ॥२ । मन अमोलिक जरी गुंफे अमूपा । तरीच हा सोपा मार्ग रया ॥३॥ बापरखुमादेविवरू ब्रह्मविद्येचा पुतळा । तेथील हे कळा निवृत्तिप्रसादें ॥४॥
अर्थ:-
तृणकाष्टापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जग ज्याच्या सत्तेने विस्तारले आहे म्हणजे व्यापलेले आहे. अशा व्यापक ब्रह्माच्या ठिकाणी मुमुक्षुने आपणच ब्रह्म कसे व्हावे. ते शब्दाने सांगता येणे कठीण आहे. तथापि जे शब्दाने सांगता येत नाही. ते सांगवे तरी कसे? तथापि ते सांगण्याला सोय फक्त श्रीगुरूकृपेचीच आहे. त्याला एकच मोठा उपाय आहे. तो हा की अमोलिक मन व्यापक परमात्म्याच्या ठिकाणी जर गुंतले तर परमात्मस्वरूपाला पोहोचण्याचा मार्ग सोपा आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, ते साक्षात् ब्रह्मविद्येचा पुतळा आहेत. त्याच्या प्राप्तीची कळा श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या कृपाप्रसादानेच कळणार आहे. असे माऊली सांगतात.