ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.706
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-६ वे, संतपर अभंग ७०६
अमृताची कुंडी निद्रिस्त मरण । झणे त्या दूषण बोलती रया ॥१॥ वासना संग धीट प्रकृति कनिष्ठ । भोगूनी वैकुंठ जन्म घेती ॥२॥ तैसे नव्हे सारासार तत्त्व निवृत्ति । बुडउनी प्रवृत्ति आपण नांदे ॥३॥ ज्ञानदेवे बोले अमृत सरिता । सर्वा घटीं पुरता हरि नांदे ॥४॥
अर्थ:-
ज्ञानप्राप्त करून घेण्याची सोय ही नरदेह अमृताची कुंडी मनुष्याला लाभली असून तो त्याकडे दुर्लक्ष करून मृत्यू पावतो. या करिता तूं दूषण देशील. परंतु कनिष्ठ स्वभावाचे विषयी पुरूष स्वर्गादि भोगांची वासना धरून त्याप्रमाणे कर्मे करून वैकुंठातील भोग भोगतात. व पुण्य संपल्यानंतर पुन्हा जन्माला येतात. मुमुक्षुची तशी स्थिती नाही.ते विषयप्रवृत्तीस आपल्या ताब्यात ठेऊन निवृत्ति मार्गाने कालक्रमण करितात. श्रीहरीच्या रूपाने ज्ञानरूपी अमृत गंगा सर्वत्र सर्वांच्या हृदयांमध्ये परिपूर्ण भरलेली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.