ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.690
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६९०
मी बोल बोलें तो गेला कवण्या ठायां । हे पुसों आलों लवलाह्यां वो । कव्हणि न सांगती मागू धावें काह्या । आतां लाजिलें ऐशा स्नेहा गे माये ॥१॥ चला कांवो मज आडोनी । रूप पाहों द्या कां माझें मजलागुनी । वेडावलें मज देखुनी शेखीं । मी माझें गेलें हारपोनी गे माये ॥२॥ मी बोला मज आंतु की बोल मजआतु । मुसें मुरालें रूप रूपातु । बापरखुमादेविवरू विठ्ठलासी एकांतु । आतां पुरला अंतु दुजेपणा गे माये ॥३॥
अर्थ:-
मी त्या भगवंताचे शब्दाने पुष्कळ वर्णन केले. असे का झाले म्हणून शास्त्राला व संतांला घाईघाईने विचारवयास गेले. तो तेथेही शब्दाचा काही मागमोस लागला नाही. तेंव्हां मला असे कळलें की शब्दाने भगवंताचे वर्णन करणे वेडेपणाचे आहे. अशा शाब्दिक प्रेमाने तो आकलन होणारा नाही. याप्रमाणे माझी मलाच लाज वाटून त्या भगवंताच्या प्रेमाने मी भुलून गेले. त्या परमात्म्याच्या दर्शनामध्ये आड येणाऱ्याला एका बाजुला सारून मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे दर्शन घेतले.त्याचा परिणाम असा झाला की माझ्या ठिकाणचा मीपणा नाहीसा झाला. तेंव्हा मला असा विचार पडला की माझ्या स्वरूपात शब्द आहे किंवा शब्दांत माझे स्वरूप आहे. किंवा रूपांत रूप आहे हे सर्वभाव स्वस्वरूपाच्या ठिकाणी मुरून गेले. याप्रमाणे माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्याशी ऐक्य झाल्यामुळे द्वैतदशेचा अंतच होऊन गेला. असे माऊली सांगतात.