ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.490
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४९०
त्यागुनी कैलास सर्वही संपत्ती । स्मशानांत वस्ती रूद्र करी ॥१॥ कासया कारणे ब्रह्म शोधावया । आलों कोठनियां माझा मीचि ॥२॥ तयाशीही पूर्ण न कळेची कांहीं । अद्यापि संदेही पडियले ॥३॥ हरिब्रह्मा सूर्य येरा कोण लेखी । नाहींच अोळखी मूळरूपीं ॥४॥ म्हणे ज्ञानदेव वस्तु परात्पर । गुरूकृपे कीर भेदिजेसु ॥५॥
अर्थ:-
ब्रह्माच्या शोधाकरिता प्रत्यक्ष शंकरदेखील कैलास पर्वत व सर्व ऐश्वर्य सोडुन स्मशानात राहीले.कशाकरिता राहिले? त्यांना शंका आली की मी कोण? कोठुन? व कशाकरिता येथे आलो? याचा उलगडा त्यानाही होईना म्हणून अजूनही ते संशयातच आहे. मग विष्णु, सूर्य, ब्रह्मा, वगैरेची गोष्ट कशाला विचारता? त्यांनाही स्वस्वरूपाची ओळख झाली नाही. ही सर्व व्यापक वस्तु गुरूकृपेशिवाय कळणार नाही. या अभंगातील तात्पर्य हे सर्व अज्ञानी होते असे नसून गुरूकृपेवांचून कितीही मोठा असला तरी त्यास स्वबुद्धिने ब्रह्मबोध होणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.